म. टा. प्रतिनिधी, पुणे
सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांना शहरातून सढळ हाताने मदत सुरू आहे. प्रशासनासोबत विविध कंपन्या, राजकीय व सामाजिक संस्था-संघटना, गणेश मंडळांकडून पूरग्रस्त गावांना भेट देऊन मदतीचे वाटप केले जात आहे.
अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाच्या वतीने सांगलीतील तुपेरे गावातील १०० पूरग्रस्त कुटुंबांना धान्याची पाकिटे वाटण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर, कार्यकर्ते चंदूशेठ कदम या वेळी उपस्थित होते. स्वामी समर्थ ट्रस्ट व महर्षिनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शिरोळ तालुक्याात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यासाठी महर्षिनगर परिसरातून संकलन फेरी काढण्यात आली. शांताराम पोमण, अरुण शिरोळे, गजेंद्र गुंड, राहुल गुंड आदी उपस्थित होते.
कोंढवा बुद्रुक येथील शांतिबन सोसायटीने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेऊन सभासदांकडून वर्गणीद्वारा जमा केलेली ५१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविली. यासाठी सोसायटीचे सदस्य टेंभूकर आणि अतुल कोतकर यांनी पुढाकार घेतला. प्रताप टेक्नोक्रॅट्सतर्फे कोल्हापुरातील हनुमंतवाडी या गावात बिस्कीट पुडे, चादर, ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी हरिश प्रजापती, ओमसिंह, कल्याणी शेटे, वैष्णव साखरकर उपस्थित होते.
पूरबाधित नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवडमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट जीवनावश्यक वस्तुंचे संकलन करण्यात आले. त्यामध्ये तांदूळ, गहू, साखर, तूरडाळ, बिस्किटांचे पुडे, पाण्याच्या बाटल्या, राजगिरा लाडू पाकिटे, डासप्रतिबंधक कॉइल, सॅनिटरी नॅपकीन, दंतमंजन आदी वस्तू पूरग्रस्तांना देण्यात आल्या. या वेळी सुरेश निकाळजे, चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब रोकडे आदी उपस्थित होते.
...
'आप'तर्फे मदत
आम आदमी पक्ष आणि आम आदमी रिक्षा चालक संघटनेने पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते. त्याला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. नागरिकांकडून जमा केलेले सहा टन खाद्यसामुग्री, अर्धा टन पीठ, जनावरांसाठी गोळी पेंडी व भुसा, सॅनिटरी नॅपकीन, ब्लँकेट, औषधे असे साहित्य घेऊन पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते आणि डॉक्टरांचे पथक पूरग्रस्त भागात रवाना झाले. या वेळी 'आप'च्या वाहतूक विभागाचे अध्यक्ष श्रीकांत आचार्य, प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे, युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे, उपाध्यक्ष संदीप सोनवणे उपस्थित होते.