म. टा. प्रतिनिधी, पुणे
'करोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीला पाठींबा देऊन, विश्व हिंदू परिषद मध्य भाग, सारसबाग येथील श्री खंडोबा मंदिर देवस्थान आणि इस्कॉन यांच्यातर्फे मजूर, रस्त्यावर राहून उपजीविका करणारे, हातावर पोट असणारे; तसेच शिक्षणासाठी येथे आलेले आणि अडकलेल्या विद्यार्थ्यांना दैनंदिन भोजन आणि मास्क वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत आठ दिवसांत या संस्थांनी १३ हजार ५०० 'भोजन किट'चे वाटप केले आहे.
गुढीपाडव्याला सुरू झालेल्या उपक्रमासाठी अनेकांनी आर्थिक आणि वस्तुरूपी मदत दिली आहे. विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ, गिरीश येनपुरे, संतोष बडदे, धनंजय गायकवाड, गणेश वनारसे यांसह अनेक कार्यकर्ते शक्य तेवढी मदत करीत आहेत. कात्रज, कोंढवा, भारती विद्यापीठ, आंबेगाव, सहकारनगर, पर्वती, स्वारगेट, दांडेकर पूल यांसह शहरातील मध्य भागांत रिक्षा आणि टेम्पोतून या किटचे वाटप करण्यात येत आहे.
चव्हाण म्हणाले, ' रस्त्यावरील भिकारी आणि निर्वासितांना गोगटे प्रशालेसह विविध शाळांत ठेवण्यात आले आहे. तेथेदेखील भोजन किट आम्ही देत आहोत. पुणे स्टेशन, ससून आवार, लोहियानगर, घोरपडी पेठ, कासेवाडी, गंज पेठ, नदीपात्र, महापालिका आणि काँग्रेस भवन यांसमोरही भोजन किट देण्यात येत आहे. आवश्यकता असलेल्या घरांत शिधा दिला जातो. दर रोज ३ हजार ५०० जणांना दुपारचे भोजन किट दिले जात आहे. यापुढेही दर रोज दिनांक १४ एप्रिलपर्यंत हा उपक्रम सातत्याने सुरू राहणार आहे.