म. टा. प्रतिनिधी, पुणे
लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात करण्यात आली असता, 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लॅपटॉप, कम्प्युटर नादुरुस्त झाल्यास ते दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी पाठविण्यास; तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना स्वत:ची दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन कामावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयांमुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी २,१६९ उद्योग, व्यवसाय सुरू झाले असून, या उद्योगांमध्ये सुमारे ८० हजार कर्मचारी कामावर जाऊ लागल्याने उद्योगचक्र मार्गावर येऊ लागले आहे.
याबाबत उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, 'हिंजवडी येथील 'आयटी' कंपन्यांत 'वर्क फ्रॉम होम' करण्यात येत आहे. पुढील काही दिवस ही व्यवस्था कायम राहणार आहे. मात्र, या कंपन्यांत अत्यावश्यक पाच ते १० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कंपनीत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप किंवा कम्प्युटर बिघडण्यास तांत्रिक अडचण सोडविण्यासाठी कर्मचारी पाठवण्याची व्यवस्था करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांना स्वत:च्या वाहनांवरून कामावर जाण्यास परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे.'
'पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणचे २,१६९ उद्योग सुरू झाले आहेत. या उद्योगांमध्ये सुमारे ८० हजार कर्मचारी कामावर जात आहेत,' असे ते म्हणाले.
पिरंगुट, तळेगाव, सणसवाडी, खेड शिवापूर, नसरापूर, कोंढणपूर, चाकण औद्योगिक क्षेत्र, रांजणगाव औद्योगिक क्षेत्र या विविध ठिकाणी २,१६९ उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) ८० मोठे उद्योग; तसेच 'एमआयडीसी'बाहेरील ८९ मोठे उद्योग सुरू झाले आहेत. या उद्योगांमध्ये सुमारे दोन लाख ४२ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर; तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील काही कर्मचारी असल्याने प्रत्यक्षात सुमारे ८० हजार कर्मचारी कामावर जाण्यास सुरुवात झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे आणि जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था संबंधित उद्योगांनी करायची आहे. मात्र, ग्रामीण भागात उद्योगांच्या जवळ राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वत:ची दुचाकी किंवा चारचाकी वाहने घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे; तसेच 'आयटी' कंपन्यांमधील अत्यावश्यक कर्मचारी आणि दुरुस्तीची कामे करणारे कर्मचारी यांना परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे.
- सदाशिव सुरवसे, सहसंचालक, उद्योग विभाग