म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या खंडाळा घाटातील १९० वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता स्फोटकांचा साह्याने जमीनदोस्त करण्यात आला. एक्स्प्रेस वेवर सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा पूल पाडण्याचा निर्णय सरकार व रस्ते विकास महामंडळाने घेतला होता.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आधुनिक ड्रिल मशिनच्या साह्याने पुलाला ४० होल पाडण्यात आले. नवयुग कंपनीतर्फे हे काम करण्यात आले. यानंतर स्फोटकांच्या साह्याने पूल पाडण्यात आला. रस्ते विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता डी. डी. उकिर्डे, अधीक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे, कार्यकारी अभियंता आर. पी. सोनवणे, ठाणे महामार्ग पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, पोलिस निरीक्षक सुदाम पाचोरकर आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक किलोमीटर क्रमांक ४४ अंडा पाँइंट येथून जुन्या मार्गाने लोणावळा एक्झिट येथून पुन्हा एक्सप्रेस वर वळविण्यात आली आहे. पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक जुन्या मार्गाने लोणावळा एक्झिट येथून ४४ अंडा पाँइंट अशी वळविण्यात आली आहे.
.
असे पडले 'अमृतांजन पूल' नाव
खंडाळा घाटात जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गालगतच्या टेकडीवर अनेक वर्षे अमृतांजन या डोकेदुखीवरील औषधाची (मलम) जाहिरात झळकत होती. त्या वेळी या परिसरातील दिसणारे मनोहरी निसर्ग सौंदर्य पहाण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असत. येथील जाहिरात फलकामुळे पुलाला अमृतांजन पूल असे नाव पडले.
.
अमृतांजन पूल आणि परिसर हा अरुंद, नागमोडी वळणे, तीव्र उतार व चढणीचा असल्याने याठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी आणि अपघात होत होते. यामुळे हे ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वर्दळीमुळे पूल पाडणे शक्य होत नव्हते. लॉकडाउनमुळे वाहतूक मंदावली असल्याने पूल पाडण्याचा निर्णय घेतला. पुलाचा ढिगारा हटवून लवकरच मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
- डी. डी. उकिर्डे, मुख्य कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ