म. टा. प्रतिनिधी, पुणे
ज्येष्ठ समाजसेविका अनुताई भागवत (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. समाजसेवेतील बहुमूल्य योगदानाबद्दल 'दलितमित्र' ही पदवी त्यांना मिळाली होती. कुष्ठरुग्णांसाठी अमरावतीत 'तपोवन' ही संस्था सुरू करणाऱ्या शिवाजीराव पटवर्धन आणि पार्वतीबाई पटवर्धन या समाजसेवक दाम्पत्याच्या त्या कन्या होत.
अनुताई भागवत यांना लहानपणी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई, दुर्गाबाई देसाई या महान विभुतींचा सहवास मिळाला. त्यांच्यावर सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, साने गुरूजी यांच्या विचारांचा संस्कार झाला आणि त्यांनी समाजकार्याला वाहून घेतले. सामाजिक क्षेत्रात अनुताईंचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. कुष्ठरुग्णाला स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्याचा अधिकार देण्याबरोबरच रोगाविषयीची भीती, घृणा व तिरस्कार नाहीसा करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव पटवर्धन यांनी 'तपोवन' केंद्राची स्थापना केली. अनुताई भागवत यांनी 'तपोवन'मध्ये कुष्ठरुग्णांची सेवा करण्याचा ध्यास घेतला. अनाथांचा सांभाळ, कैद्यांच्या मुलांना आश्रय, दिव्यांगांचे पुनर्वसन, तपोवन वस्तू विक्री केंद्र हे कार्य त्यांनी केले. स्नेहप्रकाश परिवाराच्या माध्यमातून त्यांनी दिव्यांगांसाठी काम केले. कोल्हापूरच्या 'हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप' या संस्थेच्या त्या आधार होत्या.
समाजसेवेतील योगदानाबद्दल १९७२ मध्ये गांधीजयंतीनिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अनुताईंना 'दलितमित्र' ही पदवी बहाल केली. शिवाजीराव आणि पार्वतीबाई पटवर्धन यांचा जीवनपट त्यांनी 'बिल्बदल' या पुस्तकातून उभा केला. नॅशनल बुक ट्रस्टच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनात मराठी विभागातील उत्कृष्ट पुस्तक म्हणून या पुस्तकाचा गौरव झाला. महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. 'इदं न मम' ग्रंथ व 'सागर शक्ती आकाशी' हे त्यांनी लिहिलेले नाटक गाजले. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे नाते होते.