म. टा. प्रतिनिधी, पुणे
'अंतराळात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे भविष्यात पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी खगोलशास्त्राची गरज भासणार आहे,' असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी नुकतेच व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित 'विज्ञान रंजन स्पर्धा २०२०'च्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, यासाठी आयोजित या स्पर्धेत पुण्याच्या जैनील जैन याने प्रथम क्रमांक पटकावला. बदलापूरच्या राजस कवठणकरने द्वितीय, तर कराडच्या नचिकेत शेवाळेने तृतीय क्रमांक पटकावला. या वेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, कोषाध्यक्ष शशी भाटे, दिपाली अकोलकर, पिंपरी-चिंचवड शहर अभियंता व सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे, प्रमुख कार्यकारी अधिकारी मोहन सावळे, सुनील पोटे, नंदकुमार कासार आदी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन विनय र. र. यांनी केले.
या स्पर्धेत १३ ते ५० वयोगटातील ८००पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला होता. त्यातील ५५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. या स्पर्धकांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. त्यात त्यांना विविध प्रकारचे १० प्रयोग दोन तासांत करायचे होते. यात काही प्रयोग स्वतंत्रपणे, तर काही जोडीने करायचे होते. यांत वर्गीकरण, स्पर्श, जडत्व, चलन, वनस्पती विज्ञान, भूमिती, सौर घड्याळ, प्रेरणा-प्रतिसाद ध्वनी, प्रकाश, गणित व मराठी भाषा असे प्रयोगाचे विषय होते, अशी माहिती विनय र. र. यांनी दिली.
भविष्यात पृथ्वीचे अस्तित्व टिकविण्यासाठी खगोलशास्त्राची मोठी गरज पडणार आहे. अंतराळात बदल होत आहेत. भविष्यात लहान ग्रह, आकाशात फिरणारे घटक यांच्यात धडक होऊ शकते. त्यामुळे पृथ्वीला धोका पोहोचू शकतो. २१२६ मध्ये 'स्विफ्ट' नावाचा धूमकेतू पृथ्वीजवळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीला धोका निर्माण होणार असल्यास त्यासाठी आपली पूर्वतयारी आवश्यक आहे.
- डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ