गिरीष बापट यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यात आग
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मलबार हिल येथील अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्याच्या आवारातील स्टाफ क्वार्टरमध्ये रात्री ९च्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन १०-१५ मिनिटांतच या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्याच्या जवळच बापट यांचा हा बंगला आहे. आग लागली त्यावेळी बापट हे पुण्यात होते. मंत्री गिरीश महाजन यांना आगीची माहिती कळताच त्यांनी आपल्या बंगल्यातून बाहेर पडून घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आणि परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. स्टाफ क्वार्टरचे बांधकाम लाकडी असल्याने आग अधिक भडकली. तेथील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक वस्तू व गृहोपयागी वस्तूंनी तात्काळ पेट घेतला.
'ज्ञानेश्वरी'मधील आगीची वार्ता कळताच अग्निशमन दलाने तेथे धाव घेतली आणि वेळीच अग्निशमन यंत्रणांचा वापर करून आग आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला, असे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.