अ‍ॅपशहर

पादचाऱ्यांसाठी ‘बॅरिकेडिंग’

स्वारगेट येथील जेधे चौकात अस्ताव्यस्तपणे चालणाऱ्या पादचाऱ्यांमुळे होणारा अडथळा रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग केले आहे.

Maharashtra Times 19 Jun 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे स्वारगेट येथील जेधे चौकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे वाहतुकीवरील ताण कमी झाला आहे. मात्र, रस्त्यावरून अस्ताव्यस्तपणे चालणाऱ्या पादचाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा होतो; या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिस शाखेने पादचाऱ्यांसाठी ‘बॅरिकेडिंग’ योजना अवलंबली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम barricading at jedhe chowk in swargate
पादचाऱ्यांसाठी ‘बॅरिकेडिंग’


पीएमपी बस डेपो आणि एसटीचे आगार यामुळे स्वारगेट परिसरात प्रवाशांची आणि पर्यायाने पादचाऱ्यांची संख्या खूप असते; तसेच शहरातील महत्त्वाच्या चौकांपैकी एक असलेल्या जेधे चौकातून कात्रज, कोंढवा, हडपसर या उपनगरांत जाणारी वाहने जातात. त्यामुळे येथे वाहनांची कायमच वर्दळ असते. हा चौक गजबजलेलाही असतो. एसटी स्टँडच्या परिसरातील रिक्षा, रस्त्याच्या कडेला व फुटपाथवरील अतिक्रमणे आणि त्यामुळे रस्त्यावरून चालणारे पादचारी असे चित्र पाहायला मिळते. या पादचाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्यांनादेखील जीव मुठीत घेऊन चालावे लागते. या सगळ्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिस शाखेने पादचाऱ्यांसाठी चौकाच्या चारही बाजूला बॅरिकेडिंग केले आहे. याद्वारे पादचारी केवळ झेब्रा क्रॉसिंगवरून रोड ओलांडू शकतात, अशी रचना करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

या उपाययोजनेदरम्यान जेधे चौकातील अतिक्रमणेही हटविण्यात आली आहेत. पादचाऱ्यांसाठी आता पुरेशी व सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरून अस्ताव्यस्त न चालता बॅरिकेड्सच्या आतूनच चालावे, असे आवाहनही डॉ. मुंढे यांनी केले.

बहुतांश नागरिक रस्त्यावरूनच चालताना दिसतात. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी विशेष योजना राबविण्यात आल्याचे फलक या ठिकाणी बसविले जाणार आहेत, असेही डॉ. मुंढे यांनी सांगितले. पादचाऱ्यांसाठी ‘बॅरिकेडिंग’ करण्याची योजना वाहतूक पोलिसांनी सर्वप्रथम शनिपार चौकात राबविली होती. तुळशीबाग व महात्मा फुले मंडई यामुळे शनिपार चौकात पादचाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. या योजनेनंतर बॅरिकेडिंगच्या लेनमधून पादचारी जाऊ लागल्याने वाहतुकीला होणारा अडथळा कमी झाला होता. स्वारगेट चौकातही याचे प्रमाण अधिक आहे. आता उड्डाणपुलामुळे चौकाने मोकळा श्वास घेतला असला, तरीही शंकरशेठ रोड व शिवाजी रोडने येणाऱ्या वाहनांना सिग्नलला थांबावे लागते. त्यामुळे या दोन्ही बाजूला अद्यापही पूर्वी सारखीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र, रस्त्यावरून चालणाऱ्या अस्ताव्यस्त पादचाऱ्यांना शिस्त लावल्यानंतर वाहतुकीला फायदा होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज