म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेशोत्सव साजरा करण्यामागे श्रद्धा हे एकमेव कारण नाही. आयुर्वेद, संस्कार आणि संस्कृती, धर्मशास्त्र अशा दृष्टिकोनातून गणेशोत्सवाला महत्त्व आहे. हा उत्सव साजरा करताना त्याचे शास्त्रोक्त पैलू समजून घेत आणि पर्यावरणाचे भान राखत उत्सव साजरा करा, असा सूर परिसंवादात उमटला.
ग्रंथ पारायण दिंडीच्या वतीने सदाशिव पेठेतील गीताधर्म मंडळात 'गणेशोत्सव' या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी आयुर्वेदाचार्य डॉ. प्रशांत सुरू, पंचांगकर्ते मोहन दाते, धर्मशास्त्राचे अभ्यासक प्रणव गोखले, उत्सवातील आहाराचे आयुर्वेदातील महत्त्व सांगण्यासाठी सर्वेश कुलकर्णी परिसंवादात सहभागी झाले होते. या वेळी ग्रंथ पारायण दिंडीचे विरेंद्र कुंटे, शैलेश गुजर उपस्थित होते.
गोखले म्हणाले, 'गणपती हे वेदांइतकेच जुने दैवत आहे. ज्या देवतांची आपण आज पूजा करतो, ज्यांची उपासना करतो. त्यातील अनेकांचा उल्लेख वेदांत नाही. याचा अर्थ त्यांचे अस्तित्व नव्हते असे नाही. नवीन पिढी प्रत्येक सण, उत्सव, परंपरा यासंबंधी प्रश्न विचारते आहे. त्यामुळे जिज्ञासा ही कर्मकांडाला बाजूला सारत पुढे येत असल्याचे दिसत आहे.'
कुलकर्णी म्हणाले, 'स्त्रियांमध्ये अनेक आजार वाढत आहेत. हरितालिकेच्या व्रतामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक पानाला औषधी महत्त्व आहे. स्त्रियांशी संबंधीत अनेक आजारावर त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे गणपतीचा नैवेद्य असणारे मोदक हे देखील गुणकारी आहेत. तांदूळ, गहू पित्तशामक आहे; तर नारळ बुद्धिवर्धक आहे. पंचखाद्यदेखील शरीरासाठी आवश्यक पोषकमूल्ये देतात.'
दाते म्हणाले, 'गणेशोत्सवाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. घरचा गणपती किती दिवसांचा असावा याबद्दल अनेक शंका असतात. घरचा गणपतीच्या उत्सवाचा दिवस हा फक्त एक दिवस असतो. लोकमान्य टिळकांनी सामाजिक चळवळीसाठी गणपती उत्सव दहा दिवसांचा केला. पण वर्तमानकाळात दहा दिवस घरातील गणपती शक्य नाही. परंपरांगत चालत आलेल्या प्रथा नवीन पिढीने आचरणात आणाव्यात असा आग्रह धरल्यास पुढची पिढी त्या स्वीकारणार नाही. श्रद्धा ही सत्यावर आधारलेली हवी. पर्यावरणाचे भान ठेवून उत्सव साजरा करायला हवा.'
डॉ. सुरू म्हणाले, 'व्यक्तीने, समूहाने आणि समाजाने अंगिकारलेली उत्तम जीवनशैली म्हणजे संस्कृती. आयुर्वेद हा या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे, त्याचा अंगीकार प्रत्येकाने करायला हवा.'
..