म. टा. प्रतिनिधी, पुणे
'स्पेशल चाइल्ड' अर्थात, विशेष मुलांचा संघर्ष हा त्यांचा तर असतोच; पण तो त्यांच्या कुटुंबीयांचासुद्धा तेवढाच असतो. अनेक पालकांना आपल्या पाल्यांचे हे 'वेगळे' असणे पचवणे कठीण जाते. मीही एके काळी या परिस्थितीतून गेलो होतो. ज्या वेळी माझा मुलगा मतिमंद असल्याचे निदान झाले, त्या वेळी एक बाप म्हणून मी ते स्वीकारले. चालायला लागले, म्हणजे रस्ते फुटतात, रस्ते बघून नाही चालले जात. मीही तेच केले...' अशा शब्दांत विशेष व्यक्तींना कायमस्वरूपी घर मिळवून देणारे अविनाश बर्वे यांनी आपला प्रवास मांडला.
'संघर्ष सन्मान पुरस्कार' मिळाल्यानंतर झालेल्या मुलाखतीदरम्यान बर्वे बोलत होते. ते म्हणाले, 'मी आणि माझ्या पत्नीने आमच्या मुलाला तो आहे तसा स्वीकारण्याचे ठरवले आणि त्याला अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आमचे सर्व प्रयत्न सुरू केले. विशेष मुलांसाठी डोंबिवलीत असलेल्या अस्तित्व या शाळेत त्याला टाकले; पण अठराव्या वर्षानंतर त्याला शाळेत ठेवता येणार नव्हते; म्हणून कर्नल काळे यांनी सुचवल्यानुसार विशेष व्यक्तींसाठी वसतिगृह सुरू करण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. प्रवास सहज नक्कीच नव्हता. जो निसर्ग दुःख देतो, तोच निसर्ग ते दुःख पचविण्याची ताकदही देतो, याची प्रचिती मला आली. माझा मुलगा वयाच्या २७ व्या वर्षी हे जग सोडून गेला; पण त्याच्यासारख्या सर्वांसाठी काहीतरी करण्याचे माझे प्रयत्न मी सुरूच ठेवले आहेत.'