अ‍ॅपशहर

'त्या वक्तव्याबद्दल राज्यपालांनी माफी मागण्याची गरज नाही, कारण...'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याची गरज नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2022, 4:34 pm
पिंपरी-चिंचवड: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा सत्ताधारी महाविकास आघाडी व इतर काही पक्ष, संघटनांनी निषेध केला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र राज्यपालांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ramdas-Athawale
रामदास आठवले


'समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते?' असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात केलं होतं. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असं त्यांना सांगायचं होतं. त्यावरून मोठा गदारोळ झाला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा एक व्हिडिओ ट्वीट करून राज्यपालांना उत्तर दिलं होतं, तर शिवाजी महाराज न कळलेला राज्यपाल महाराष्ट्रात नको, अशी भूमिका काहींनी व्यक्त केली होती. भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांनी इतिहास वाचला असता तर असं वक्तव्य केलं नसतं. त्यांनी तात्काळ हे वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. या चौफेर टीकेनंतर राज्यपालांनी सारवासारव केली होती. माझ्याकडं असलेल्या माहितीनुसार मी तसं बोललो होतो, असं ते म्हणाले होते.

वाचा: ईडीच्या कठोर कारवाईनंतर उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे 'नॉट रिचेबल'

पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या रामदास आठवलेंनी या वादावर भाष्य केलं. 'राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य नेमकं काय आहे ते आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते ही गोष्ट खरी आहे. राज्यापालांचं वक्तव्य कोणत्या अर्थानं घेतलं गेलं ते पाहावं लागेल. रामदासांमुळंच शिवाजी महाराज होते असं जे काही वर्तमानपत्रांमध्ये छापून आलंय ते योग्य नाही. रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं, प्रेरणा होती. ही गोष्ट खरी आहे, असं आठवले म्हणाले.

राज्यपालांनी माफी मागायला हवी का असं विचारलं असता, 'माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी खुलासा दिलेला आहे. त्यामुळं माफी मागण्याची गरज नाही,' असं ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज