पुणे : भारती विद्यापीठातर्फे पूरग्रस्तांना सहकार्य म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला पंचवीस लाख रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप या वेळी उपस्थित होत्या. 'ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे महापुराचा प्रचंड तडाखा बसला. शेकडो गावे जलमय झाली. हजारो लोक बेघर झाले. त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. पिके आणि जनावरे वाहून गेल्यामुळे शेतीचे नुकसान झाले. अनेकांना प्राणास मुकावे लागले. महापुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची आणि सुरक्षितस्थळी नेण्याची व्यवस्था, बेघर झालेल्यांसाठी निवासाची आणि भोजनाची सोय, औषधोपचाराची सुविधा; तसेच जनावरांसाठी छावण्यांची व चाऱ्याची व्यवस्था ठिकठिकाणी भारती विद्यापीठाच्या पुढाकाराने करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर गावांची स्वच्छता, रोगराई पसरू नये यासाठीची खबरदारी, आजारी रुग्णांवर औषधोपचार या कामांतही भारती विद्यापीठाने कृतिशील योगदान दिले,' असे डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
भारती विद्यापीठाची २५ लाखांची मदत
भारती विद्यापीठातर्फे पूरग्रस्तांना सहकार्य म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला पंचवीस लाख रुपयांची मदत करण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2019, 4:00 am