म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाविकास आघाडी सरकारचा गेल्या तीन महिन्यांतील कारभार हा निष्क्रिय आणि अपयशी असल्याचा आरोप करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जंगली महाराज रस्त्यावर झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा चौकात मंगळवारी सकाळी जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांची झालेली फसवणूक, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत झालेली वाढ, कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न, असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
भाजपचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार दिलीप कांबळे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, प्रदेश संपर्क प्रमुख गणेश बिडकर, शहर सरचिटणीस राजेश पांडे, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, महिला आघाडी अध्यक्षा शशिकला मेंगडे, तसेच नगरसेवक, माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
'महाविकास आघाडी हे स्थगिती सरकार असून, गेल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचे काम करते आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. कर्जमाफी योजनेत अटी वाढवून शेतकऱ्यांची अडचण करण्यात येत आहे. महाआघाडीच्या मंत्र्यांची वक्तव्ये पाहता पुणे शहरातील मेट्रो, एचसीएमटीआर, हायपरलूप यासारख्या बड्या प्रकल्पांना धोका निर्माण झाला आहे,' अशी टीका यावेळी करण्यात आली.