अ‍ॅपशहर

भाजप करतेय गुंडांची ‘धुलाई’

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अनेक गुंडांचा प्रवेश झाला. भाजप वॉशिंग मशिन असून, वॉशिंग पावडर असलेले हे सरकार आहे. या पक्षात आलेल्या प्रत्येकाला धुवून स्वच्छ केले जाते. भाजपचा अगदी ‘पारदर्शी’ कारभार सुरू आहे, अशी कोपरखळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी मारली.

Maharashtra Times 18 Feb 2017, 9:05 am
म. टा. प्रतिनिधी खडकी /पिंपरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp is working like washing machine
भाजप करतेय गुंडांची ‘धुलाई’


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अनेक गुंडांचा प्रवेश झाला. भाजप वॉशिंग मशिन असून, वॉशिंग पावडर असलेले हे सरकार आहे. या पक्षात आलेल्या प्रत्येकाला धुवून स्वच्छ केले जाते. भाजपचा अगदी ‘पारदर्शी’ कारभार सुरू आहे, अशी कोपरखळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी मारली.
पुणे महापालिकेतील औंध-बोपोडी (प्रभाग क्रमांक आठ) आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे (प्रभाग क्रमांक २६) पिंपळे निलख या ठिकाणी आयोजित प्रचार सभेत चव्हाण बोलत होते. या प्रसंगी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हुसेन दलवाई, विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, दत्तात्रय गायकवाड तसेच दोन्ही प्रभागातील सर्व उमेदवार उपस्थित होते.
‘भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या सुरू असेलले भांडण हा दिखावा असून, मुंबई महानगरपालिकेतील लोण्याचा गोळा खाण्यासाठी हे सर्व चालले आहे. निवडणुका संपल्यानंतर यांचे भांडणही थांबेल आणि हे दोघे पुन्हा गळ्यात गळे घालून फिरतील,’ असा दावाही चव्हाण यांनी केला. भाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत राज्याची आणि देशाची काय अवस्था केली ती सर्वजण पाहत आहेत. महागाई, नोटाबंदी, खोटी आश्वासनांनी जनता त्रस्त झाली आहे. भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर, मशिदीचा मुद्दा उपस्थित करून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केली आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. आताही तोच प्रयत्न सुरू आहे. सध्याचा त्यांचा नारा आहे की, ‘मंदिर वही बनाएंगे; लेकीन तारीख नही बताएंगे’. शिवसेनेचे नेते खिशात राजीनामा घेऊन फिरतात, मात्र देत नाहीत. त्यांचेही भाजपसारखेच ‘राजीनामा हम देंगे; लेकीन तारीख नही बताएंगे,’ असे धोरण आहे, असेही चव्हाण यांनी नमूद केले.

‘युतीच्या भांडणावर कर लावा’
शिवसेना आणि भाजपच्या भांडणामुळे चांगले मनोरंजन होत असून, त्यावर कर लावण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी भाजपला मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप-शिवसेनाला सरकार चालवता येत नसेल, तर त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांना महानगरपालिका काय चालवता येणार आहे, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. या फेकू सरकारला बाजूला सारून काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज