अ‍ॅपशहर

चंद्रकांत पाटील लिहिणार रश्मी ठाकरेंना पत्र; करणार 'ही' तक्रार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे 'सामना'तील टीकेमुळे दुखावले असून ते याबाबत 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार करणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2021, 2:03 pm
मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तील अलीकडच्या एका अग्रलेखात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका-टिप्पणी केली गेल्यामुळं ते नाराज झाले आहेत. 'सामना'तील या गलिच्छ भाषेबद्दल चंद्रकांत पाटील हे 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडं तक्रार करणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rashmi Thackeray-Chandrakant Patil


खुद्द पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 'सामना'च्या अग्रलेखातून माझ्याविरोधात गलिच्छ लिखाण केलं जातं. मागे औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याविषयी मी जेव्हा बोललो, तेव्हा माझ्याविरुद्ध लिहिलं गेलं. ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ही मागणी केली होती, असं अग्रलेखात म्हटलं गेलं होतं. अलीकडंच संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली. त्यानंतरच्या अग्रलेखातही वाईट भाषा वापरण्यात आली होती. त्याबद्दल मी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. रश्मी वहिनी संपादक असलेल्या वृत्तपत्राचं असं संपादकीय असू शकत नाही,' असं पाटील म्हणाले.

संभाजीनगर झालंच पाहिजे!

औरंगाबादच्या नामांतराविषयी देखील ते सविस्तर बोलले. 'शिवसेनेनं आता बाळासाहेबांची मागणी लावून धरावी. काँग्रेसनं नामांतराला विरोध केलाय. त्यावर शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यातील विसंवादाचं आम्हाला घेणंदेणं नाही. आमची भूमिका ठरलेली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर व्हायलाच पाहिजे,' असं पाटील म्हणाले. 'जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून देणं हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. त्यातही मुंबई महापालिका हे आमचं लक्ष्य आहेच. थेट दिल्लीहूनही मुंबईवर लक्ष दिलं जाईल,' असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज