म. टा. प्रतिनिधी, पुणे
'भारतीय जनता पक्षाला राज्यात कोणताही राजकीय पक्ष टिकू नये असे वाटते. त्यामुळे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेलाही संपवून हिंदुत्वाची मते विभागली न जाता केवळ आपल्याकडे असावी, हेच भाजपचे सूत्र आहे. त्यामुळे भाजप आपल्याला संपवायचा प्रयत्न करतोय, हे कधीतरी त्यांच्या लक्षात येईल,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेला डिचविले. 'राज्यात भाजपची प्रतिमा मलीन झाली असून, सर्व मार्गांचा अवलंब करून सत्ता टिकविणारा भ्रष्ट राजकीय पक्ष म्हणून ओळखला जाईल,' अशी टीकाही त्यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष चेतन तुपे उपस्थित होते.
'लोकसभेला सर्वाधिक जागा मिळूनही भाजप राजकीय भ्रष्टाचार करीत आहे. आत्मविश्वास ढासळला असल्याने, जनाधार नसल्यानेच इतर पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, राज्यातील जनता फोडाफोडीच्या राजकारणाला थारा देणार नाही. कमकुवत असलेले, पराभवाच्या भीतीने ग्रासलेले नेते पक्ष सोडून जात आहेत. जनतेशी प्रतारणा करणाऱ्या या नेत्यांच्या मतदारसंघात शरद पवारांनी पाऊल ठेवल्यावर 'पॉलिटिकल डॅमेज' किती झाले ते त्यांना समजेल,' असा इशाराही त्यांनी दिला.
.
त्यांनीही मुलाखत दिली होती...
शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत, तर दुसरे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असून त्यांची मुलाखत पक्षातर्फे घेण्यात आली. याविषयी विचारणा केली असता, 'एकाने लोकसभा निवडणुकीवेळी मुलाखत दिली होती, एक आता विधानसभा निवडणुकीच्या मुलाखत देत आहे. त्यामुळे तुलना करणे योग्य नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जत-जामखेडसंदर्भात चाचपणी सुरू असून अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
.
मला पाच वर्षांपासून ऑफर
'भाजपकडून जयंत पाटील यांनाही पक्षप्रवेशाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर 'मला पाच वर्षांपासून 'ऑफर' होती. विधानसभेत अनेक मंत्र्यांनी तुम्ही आमच्याकडे या, असे अनेकदा सांगितले. मात्र, माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहेत, तोपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही. सत्तेला, लोभाला, दबावाला बळी पडून गेलेल्यांची फिकिर न करता राष्ट्रवादी पुन्हा राज्यात जिद्दीने उभा करू,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.