अ‍ॅपशहर

पुस्तकांना फुटले पाय

वाचून झाल्यामुळे कपाटात बंदिस्त झालेल्या पुस्तकांना शनिवारी आणि रविवारी पाय फुटले. हे वाचून जरा आश्चर्य वाटले ना ? पण ही पुस्तके बाहेर आली अन दुसऱ्या वाचकांच्या हातामध्ये अलगद विसावली. वाचकांनीही आपल्याकडील वाचलेली पुस्तके देऊन वाचनासाठी नवी असलेली पुस्तके हातात घेतली. ‘पुस्तकांच्या बदल्यात पुस्तके’ असा हा मोफत पण अमूल्य भाषा व्यवहार वाचनानंद देणारा होता. विविध वाचकांच्या कपाटातून बाहेर आलेल्या पुस्तकांचाच हा एकमेकांशी संवाद होता.

Maharashtra Times 12 Jun 2017, 3:00 am
‘पुस्तकांच्या बदल्यात पुस्तके’ योजनेतील भन्नाट उपक्रम पुण्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम books reading
पुस्तकांना फुटले पाय

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाचून झाल्यामुळे कपाटात बंदिस्त झालेल्या पुस्तकांना शनिवारी आणि रविवारी पाय फुटले. हे वाचून जरा आश्चर्य वाटले ना ? पण ही पुस्तके बाहेर आली अन दुसऱ्या वाचकांच्या हातामध्ये अलगद विसावली. वाचकांनीही आपल्याकडील वाचलेली पुस्तके देऊन वाचनासाठी नवी असलेली पुस्तके हातात घेतली. ‘पुस्तकांच्या बदल्यात पुस्तके’ असा हा मोफत पण अमूल्य भाषा व्यवहार वाचनानंद देणारा होता. विविध वाचकांच्या कपाटातून बाहेर आलेल्या पुस्तकांचाच हा एकमेकांशी संवाद होता.
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘पुस्तक द्यावे, पुस्तक घ्यावे, अखंड वाचत जावे’ या भन्नाट उपक्रमाची ही क्षणचित्रे आहेत. घरात ग्रंथालयाचे संग्रहालय होऊ नये, यासाठी केलेला हा अट्टाहास वाचकप्रेमींना नवनवीन पुस्तके वाचायला मिळवून देण्याचा उपक्रम ठरला. कपाटातील पुस्तकांचे करायचे काय, हा प्रश्न या उपक्रमाने चुटकीसरशी सोडविला आणि आपल्याकडील पुस्तकांच्या बदल्यात दुसरी पुस्तके घेऊन पुस्तकप्रेमींनी वाचनानंद अनुभवला.
गुडलक कॅफेच्या मागील ‘करण व्हिक्टोरिया’मध्ये शनिवारी आणि रविवारी या उपक्रमाची गडबड होती. या उपक्रमादरम्यान सुप्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट, दीपा देशमुख, अभिनेत्री नेहा जोशी यांनीही उपक्रमाला भेट दिली. वाचकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी या दरम्यान मिळाली. रविवारी दिवसभर उपक्रमासह आनंदाची कॅलिग्राफी, लहान मुलांसाठी अक्षर सुलेखन प्रात्यक्षिक कार्यशाळा असे कार्यक्रम पार पडले. माधवी मेहेंदळे आणि मंदार जोगळेकर यांच्याशी गप्पा रंगल्या.
उपक्रमाचे प्रमुख विनायक रानडे यांनी ‘मटा’ला सांगितले, ‘कपाटातील बंदिस्त पुस्तके या उपक्रमामुळे बाहेर आली. वाचकांना आपल्याकडील दोन पुस्तकांच्या बदल्यात दोन पुस्तके घेता आली. शेकडो वाचकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याने हजारो पुस्तकांची देवाण-घेवाण झाली.’ ‘या उपक्रमाची नाशिक येथे कुसुमाग्रजांच्या घरापासून सुरुवात झाली. मुलुंड, ठाणे, कल्याण येथे आणि आता पुण्यात या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापुढे औरंगाबाद, अहमदनगर व जबलपूर अशा ठिकाणी उपक्रम होईल. वाचन चळवळ दृढ करण्यासाठी, पुस्तक-वाचक असे नाते निर्माण करण्यासाठी तसेच कपाटातील पुस्तक बाहेर येण्यासाठी हा उपक्रम सर्वत्र राबविण्याची तयारी आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

००
‘पुस्तकांच्या बदल्यात पुस्तके’ या उपक्रमाला नाशिक येथे कुसुमाग्रजांच्या घरातून सुरुवात झाली. मुलुंड, ठाणे, कल्याण आणि पुणे येथे या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतर औरंगाबाद, अहमदनगर व जबलपूर येथे हा उपक्रम होणार आहे. वाचन चळवळ दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- विनायक रानडे, उपक्रमाचे प्रमुख

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज