म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा ज्वर पुढचे काही दिवस तापणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष असेल. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली तरी जिल्ह्यातील बहुतेक मतदारसंघातील लढती अस्पष्ट आहेत. त्यामुळे पुढचे दोन दिवस यादृष्टीने महत्वाचे आहेत.
जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून गतवेळी शिवसेना, भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. सहापैकी पाच मतदार संघातून भाजपने विजय मिळवला होता. तर एकमेव बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर निवडून आले होते. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत हाती शिवबंधन बांधले आहे. आता राज्यात शिवसेना-भाजप युती होते का याकडे लक्ष असणार आहे. त्यावर जिल्ह्यातील काही मतदारसंघात समिकरण बनतील किंवा बिघडू शकतील.
बीड मतदार संघात आमदार जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यांनी प्रचारास सुरुवात केली असून त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांच्याशी होईल. मात्र, मागच्या वेळी जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात लढलेले आमदार विनायक मेटे हे ही बीडची जागा ही घटकपक्ष म्हणून आपली असल्याचे जागेवर हक्क सांगत आहेत. शिवसेनेचा बीड हा परंपरागत मतदारसंघ आहे. शिवसेना ही जागा सोडण्याची शक्यता नाही तसेच एमआयएम आणि वंचित आघाडीचे उमेदवार बीडमध्ये कोण येतात यावर ही बरीच गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे बीड मतदार संघाकडे लक्ष असणार आहे.
जिल्ह्यातील केज मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर केल्यानंतरही केज मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांच्या फेसबुक पोस्टवरून शरद पवार आणि राष्ट्रवादीचे चिन्ह गायब झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशबद्दल चर्चा सुरू झाली आहे. केजमधून विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित होतो. केजमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मुंदडा नाकारुन भाजपमध्ये जाणार असतील तर राष्ट्रवादीला कमी वेळेत नवीन उमेदवार शोध मोहिम राबवावी लागेल. त्यासोबतच काहीसे चित्र माजलगाव मतदार संघात आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री प्रकाश सोलंके यांची उमेदवारी जाहिर केली आहे. दुसरीकडे भाजपमध्ये मात्र उमेदवारी कुणाला हे जाहीर झाले नाही. विद्यमान आमदार आर. टी. देशमुख यांच्याबरोबर रमेश आडसकर यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. मोहन जगताप आणि मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची चर्चा झडते आहे.
आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही. त्याठिकाणाहून बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपचे विद्यमान आमदार भीमराव धौंडे तयार आहेत. त्याबरोबर आमदार सुरेश धस यांनी ही मुलाखत दिली आहे. त्यामुळे आष्टीमधले चित्र ही दोन दिवसांत स्पष्ट होईल. गेवराई आणि परळीत मात्र लढती स्पष्ट आहेत. परळीमध्ये परंपरागत मुंडे बंधु-भगिनी एकमेकासमोर लढतील तर गेवराईमध्ये राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित विरुद्ध भाजपचे लक्ष्मण पवार अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील लढती स्पष्ट होण्यासाठी पुढचे दोन दिवस महत्वाचे असणार आहेत हे मात्र नक्की .