म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळ भरधाव कार पुढे जात असलेल्या गॅस टँकरला मागून जोरात धडकली. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुसमारास झालेल्या या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांध्ये कारचालक, दोन महिला आणि एका दहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
सातारा येथून लग्नानंतर कारने हे लोक मुंबईला परत जात होते. त्या वेळी हा अपघात झाला. जखमी महिलेवर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक अभय नारायण कोकरे (वय २६), सविता लक्ष्मण मोरे (वय ३६), प्रियंका मोहन खर्गे (वय ३५), रिया मोहन खर्गे (वय १०, सर्व रा. मूळ विभुतवाडी, आटपाडी, सांगली. सध्या रा. मुंबई), अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत आणि जखमी स्विफ्ट कारने (एमएच ११ सीएच १८८९) त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्न समारंभाला सांगलीला गेले होते. लग्नानंतर ते सर्व पुन्हा साडेआठ वाजता मुंबईला निघाले. पहाटे साडेचारच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील रसायनी गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक १७जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुढे जाणाऱ्या गॅस टँकरवर (एमएच ४३ बीजी ७०११) मागून जोरात धडकली. यात कारचा चुराडा झाला आणि कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच पळस्पे महामार्ग पोलिस आणि रसायनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्ते विकास महामंडळाच्या देवदूत आपत्कालीन पथकाच्या मदतीने कारमधील मृतांना आणि जखमीला बाहेर काढले. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. या प्रकरणी अधिक तपास एपीआय पी. डी. पाटील करीत आहेत.