म. टा. प्रतिनिधी, पुणे
औरंगजेबाने सन १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर येसूबाई आणि युवराज शाहू राजांना कैदी केले. ३० वर्षांची शिक्षा भोगून ४ जुलै १७१९ रोजी येसूबाई राजधानी सातारा येथे आल्या. या घटनेला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. इतिहासप्रेमी मंडळातर्फे या घटनेची त्रिशताब्दी साजरी केली जाणार आहे. आज, रविवारी (३० जून) सायंकाळी ६.३० वाजता कसबा पेठेतील लाल महालात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या पोवाड्याने होणार आहे. या वेळी मोहन शेटे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. पेशव्यांचे वारसदार उदयसिंह पेशवा, पिलाजीराव जाधवरावांचे वंशज समीर जाधव, नाना फडणीसांच्या वंशज वैशाली फडणीस उपस्थित राहणार आहेत.
शहा कुटुंबीयांची देणगी
डॉ. गौरी शहा यांच्या आई रजनी शहा आणि वडील सुधीर सी. शहा यांनी गौरीच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सीओईपी माजी विद्यार्थी असोसिएशनला पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात शहा परिवार, सीओईपी माजी विद्यार्थी असोसिएशन व सीओईपी यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या वेळी रजनी शहा, सुधीर शहा, पर्सिस्टंट सिस्टीमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, 'सीओईपी'चे संचालक डॉ. बी. बी. अहुजा आदी उपस्थित होते. अभियांत्रिकी महाविद्यालयातील 'बेस्ट आउटगोइंग स्टुडंट' असलेल्या डॉ. गौरी शहा यांनी १९९८ मध्ये संगणक अभियांत्रिकीतील बी. ई. पदवी संपादन केली. नंतर अमरिकेतील येल विद्यापीठातून पीएचडी केली. त्यांनी गुगल, आईबीएम आणि पर्सिस्टंट सिस्टीम येथे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले होते.