म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सध्याच्या युगात आपण भवतालच्या बदलांबद्दल दक्ष राहिले पाहिजे. अद्ययावत होत असलेल्या नव्या गोष्टी आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. जीवनात पुढे जाण्यासाठी चांगले बदल अत्यंत महत्त्वाचे असून, परिवर्तनासाठी कधीही घाबरू नका. त्यासाठी तयार राहून प्रयत्न, बांधिलकी आणि प्रामाणिकपणा अंगीकारत यशाच्या मार्गावर चालावे,' असे मत 'ऑल इंडिया शिपिंग बोर्डा'चे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.
'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'च्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे आयोजित दीक्षांत समारंभात रावत बोलत होते. या समारंभात जवळपास ७८० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून 'आयसीएआय'चे अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड, दीक्षांत समारंभाचे समन्वयक आणि केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, डॉ. एस. बी. झावरे, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, श्रीनिवास जोशी, उमेश शर्मा, यशवंत कासार आदी उपस्थित होते. 'सीए'सारख्या अवघड परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या पालकांचे कौतुक असल्याचे रावत यांनी सांगितले. 'पंतप्रधानांच्या स्वाक्षरीपेक्षा सीएच्या स्वाक्षरीला अधिक महत्त्व आहे. भविष्यात अधिक प्रगती करावयाची असल्यास अद्ययावत आणि तांत्रिक ज्ञान घेणे गरजेचे आहे. देशाला अधिक चांगली सेवा देण्यासाठी नीतिमान आणि उत्कृष्ट काम करणारे सीए हवे आहेत. आज १३० कोटी जनतेमध्ये केवळ ३.१५ लाख सीए आहेत. यामुळे सीएला मोठ्या संधी उपलब्ध आहेत,' असे छाजेड यांनी सांगितले. 'आयसीएआय'द्वारा आयोजित प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ज्ञान केंद्र, डिजिटल लर्निंग हब विकसित होत असल्याचे छाजेड यांनी सांगितले. सीए चंद्रशेखर चितळे यांनी 'आयसीएआय'कडून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांविषयी, युनिक आयडेंटिफिकेशन नंबरविषयी सांगितले. याशिवाय सनदी लेखापालांना शपथही दिली. चितळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वेळेचे नियोजन, नैतिक मूल्य आणि तंत्रज्ञान या विषयांचे महत्त्व सांगितले.