म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरकर आणि त्यांच्यासह उद्धव ठाकरे मुंबईकर, या बहुरंगी आणि बहुढंगी लोकनाट्य तमाशाने महाराष्ट्राच्या जनतेचे खूप मनोरंजन झाले असून, चौकीदार चोर म्हणणारे, चौकीदार थोर आहेत असे म्हणू लागले आहेत. ही बनवाबनवी राजकारणात चालत असली तरी जनतेने विवेक जागृत ठेवावा,' असे आवाहन माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनोमिलनाविषयी भापकर यांनी उपाहासात्मक टीका केली आहे. भापकर म्हणाले, 'बारणे आणि जगताप २००९ पासून कुरघोडीचे राजकारण करीत आले आहेत. त्यामध्ये बारणे यांनी जगताप यांना 'सत्तेची धुंदी', 'टीडीआर माफिया', 'नदीपात्र चोर' म्हणून हिणवले. जगताप यांनीही 'श्रीरंग हा नटरंग आहे', 'माती चोर', 'फोटोवाला खासदार', 'मावळचा मावळता खासदार' अशी जहरी टीका केली. या आरोप आणि प्रत्यारोपांची जुगलबंदी शहराने अनुभवली. भाऊ सांगवीकरसह अप्पा थेरगावकर यांच्या तमाशाने जनतेची करमणूक केली, त्यांची बनवाबनवीही रंगली.'
'पालिकेच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याबाबत वारंवार तक्रारी केल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी बारणे-जगताप यांचे मनोमिलन झाले आणि सर्व आरोप मागे घेण्यात आले. शिरूरमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही आमदार महेश लांडगे यांच्याशी सूर जमवले आहेत. या दोन्ही प्रकरणांतून भ्रष्टाचाराच्या विरोधातील खासदारांचा लढा बोगस असल्याचे दिसून येत असून, जनतेच्या संबंधित विषयावर माघार घेणे योग्य नाही,' असेही भापकर यांनी म्हटले आहे.