म. टा. वृत्तसेवा, मंचर
करोना प्रादुर्भावाबाबत ग्रामीण भागात कशी परिस्थितीची आहे, याची विचारपूस करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांच्याशी दूरध्वनीवरून रविवारी संवाद साधला.
ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे का, नागरिक मास्कचा वापर करतात का, इतर मदत मिळते का, यांसह विविध विषयांवर ठाकरे यांनी गांजाळे यांच्याशी चर्चा केली; तसेच योग्य खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन केले. 'मंचर ग्रामपंचायतीच्या वतीने करोनाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून, अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यात येत आहेत. फक्त ३ टक्के नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडत आहेत,' अशी माहिती गांजाळे यांनी ठाकरे यांना दिली.