म. टा. प्रतिनिधी, पुणे
'करोना'च्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने 'टास्क फोर्स' आणि विविध उपसमित्या स्थापन केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या १८ सदस्यांचा 'टास्क फोर्स' तयार करण्यात आल्याची घोषणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'टास्क फोर्स'मध्ये खासदार भालचंद्र मुगणेकर समन्वयक आहेत. टास्क फोर्सच्या अंतर्गत विविध उपसमित्यांमध्ये सामाजिक व आर्थिक परिणाम उपसमिती, आरोग्य उपसमिती, सरकारी उपाययोजना अवलोकन उपसमिती आणि माध्यम, सोशल मीडिव मदत कक्ष अशा उपसमित्या कार्यरत असतील. खासदार राजीव सातव, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार संग्राम थोपटे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा या 'टास्कफोर्स'मध्ये समावेश आहे.
काँग्रेसने विविध उपसमित्याही स्थापन केल्या आहेत. सरकारी उपाययोजना अवलोकन उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी खासदार रजनी पाटील यांच्याकडे देण्यात आली असून, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी समन्वयक आहेत. समितीचे सचिव म्हणून अमर खानापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत माजी मंत्री रोहिदास पाटील, शिवाजीराव मोघे, सुरेश शेट्टी, बाबा सिद्दिकी, दिलीपराव देशमुख, वसंत पूरके यांच्यासह २१ सदस्यांचा समावेश आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने 'करोना'चा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे समन्वयक जोशी यांनी दिली.