म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील आठ ठिकाणी प्रयोगशाळांना 'करोना' चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुण्यातील सरकारी मेडिकल कॉलेज असलेल्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये आजपासून (गुरुवारी) 'करोना' विषाणूची चाचणी करण्याची सुविधा सुरू होणार आहे. त्याशिवाय मुंबईतील केईएम आणि कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत आणखी एक सुविधा सुरू होणार आहेत; तसेच जे. जे. रुग्णालय, सोलापूर, धुळे, मिरज आणि औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयांतही येत्या आठ दिवसांत विषाणू चाचणीसाठी सुविधा सुरू करण्यात येणार आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. टोपे यांनी 'एनआयव्ही'च्या प्रयोगशाळेला भेट दिली. त्या वेळी आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आय़ुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, साथरोग नियंत्रण समितीचे डॉ. सुभाष साळुंखे आदी उपस्थित होते.
'एनआयव्ही'सारखीच चाचणी करण्यासाठी राज्यातील आठ ठिकाणी प्रयोगशाळांना चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. चाचणी करण्यासाठी 'आरटीपीसीआर' आणि 'न्युक्लिअर एक्स्ट्रॅक्टर' यांसारखी उपकरणे या प्रयोगशाळांत आहेत. मात्र, केंद्र सरकारची मान्यता नसल्याने या ठिकाणी प्रयोगशाळा चाचणी करता येत नव्हती; परंतु केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी तत्काळ परवानगी देण्याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) निर्देश दिले. त्यानुसार बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये आज, गुरुवारपासून प्रयोगशाळा चाचणी सुरू होईल. त्या ठिकाणी सुमारे दररोज १८० ते २०० चाचण्या करता येतील. मुंबईतील केईएम रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात आणखी एका प्रयोगशाळेत या चाचणीची सुविधा उद्यापासून सुरू होईल, अशी माहिती टोपे यांनी दिली; तसेच हाफकिन इन्स्टिट्यूट येथे चाचणी करण्यासंदर्भात चर्चा केली असून, त्या ठिकाणी दोन प्रयोगशाळा सुरू होतील.
'वाढत्या रुग्णांची चिंता'
महाराष्ट्रातील 'करोना'चा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आम्हाला चिंता वाटत आहे. अधिक उपाययोजनांबाबत आपण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो असल्याचे टोपे यांनी सांगितले.
...
सरकारी कार्यालयांत
५० टक्के मनुष्यबळ
राज्यातील सरकारी कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने, तसेच रोज ५० टक्के कर्मचारी येतील या हिशेबाने सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जाहीर केले. 'करोना' फैलाव रोखण्यासाठी गर्दी रोखणे महत्त्वाचे असल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. याशिवाय मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवरील ५० टक्के दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. यापूर्वी राज्यातील शाळा, महाविद्यालये, जलतरण तलाव, जिम, मॉल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' दिले आहे.
...