म. टा. प्रतिनिधी, पुणे
'ओटीपी'चा वापर करून किंवा ग्राहकाच्या खात्यातून परस्पर पैसे काढून आर्थिक फसवणूक झालेल्या जवळपास शंभर प्रकरणातीलल साडेचार कोटी रुपये सायबर गुन्हे शाखेच्या प्रयत्नांनंतर संबंधित तक्रारदारांना परत मिळाले आहेत. विशेष म्हणजे, तक्रारदारांनी अनोळखी व्यक्तीला 'ओटीपी' सांगितल्यानंतर झालेल्या फसवणुकीतही पोलिसांच्या प्रयत्नांनी परतावा मिळाला आहे.
शहरातील सायबर गुन्ह्यांचे विशेषत: ऑनलाइन फसवणुकीचे गुन्ह्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्या वाढले आहे. त्यात ग्राहकाला विश्वासात घेऊन त्यांच्या मोबाइलवरील 'ओटीपी' विचारून फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, ग्राहकांकडून 'ओटीपी' किंवा गोपनीय माहिती न घेता, त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. यामध्ये एटीएम कार्ड 'क्लोनिंग'चा अधिकाधिक वापर झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या साडेचार महिन्यात शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे अशा प्रकारच्या फसवणुकीचे ९५ अर्ज दाखल झाले होते. या तक्रारदारांची एकूण चार कोटी ६२ लाख ४५ हजार ६५४ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. मात्र, या प्रकारे झालेल्या फसवणुकीला ग्राहक स्वत:हा जबाबदार राहत नाही. त्यामुळे बँकेकडे पाठपुरावा करून हे पैसे संबंधितांना पुन्हा मिळू शकतात. सायबर गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांना या प्रकरणी मार्गदर्शन करून बँकेकडे पाठपुरावा करून ही सर्व रक्कम त्यांना मिळवून दिली आहे, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
सायबर गुन्हे शाखेची कामगिरी
महिना रिफंड केलेले अर्ज रक्कम
जानेवारी ४० २२,५४,९७०
फेब्रुवारी १७ १५,२३,३८९
मार्च २५ ७,७८,१४९
एप्रिल ७ ४,१४,३४,९८८
मे ११ २,५४,००० (१८ मेपर्यंत)
'ओटीपी' न वापरता किंवा एटीएम कार्ड क्लोनिंग करून ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक झाल्यानंतर बँकेकडून संबंधितांना पैसे परत केले जातात. मात्र, अनोळखी व्यक्तीला 'ओटीपी' सांगितल्यानंतर त्यांच्या खात्यातून काढलेली रक्कम सायबर शाखेने पाठपुरावा करून परत मिळवून दिली आहे. नागरिकांनी आर्थिक व्यवहारांबाबत विशेष काळजी घ्यावी. कोणालाही 'ओटीपी शेअर' करू नये.
- संभाजी कदम, उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा