म. टा. प्रतिनिधी, पुणे
वडील सतत धाकात ठेवत असल्यामुळे मुलाचे त्यांच्यासोबत पटत नव्हते. त्यामुळे त्याने घर सोडून जाण्याचा विचार सुरू केला. कॉलेजची फी भरण्यासाठी वडिलांचे डेबिट कार्ड घेऊन त्याने सर्व दहा लाख रुपये स्वतःच्या खात्यावर घेतले आणि रागाच्या भरात घर सोडून निघून गेला. वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून रक्कम थांबविली. मुलाचा शोध घेऊन त्याचे समुपदेशन करत त्याला पुन्हा रक्कम वडिलाच्या खात्यावर पाठविण्यासही सांगितले. चूक झाल्याचे मान्य करून तो वडिलांसोबत घरी परतला.
पुण्यातील शनिवार पेठ परिसरात हा सर्व प्रकार घडला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब चुडप्पा व उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्या प्रयत्नामुळे संबंधित मुलगा घरी आला आणि त्यांना पैसेदेखील परत मिळाले. त्यामुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले. तक्रारदार शनिवार पेठेत कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा व्यवसाय असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा २१ वर्षांचा असून तो 'बीबीए'चे शिक्षण घेत आहे. लहानपणापासून वडील त्याला धाकात ठेवायचे. त्यांच्या शिस्तीमुळे मुलाचे वडिलांसोबत पटत नव्हते. अधून-मधून त्यांचे वाद व्हायचे. त्यामुळे त्याने रागाच्या भरात घर सोडण्याचे ठरविले होते. त्यासाठी एके दिवशी त्याने कॉलेजची फी भरायची असल्याचे सांगून वडिलांचे डेबिट कार्ड घेतले. त्याद्वारे ऑनलाइन दहा लाख रुपये स्वतःच्या खात्यावर हस्तांतर करून घेतले आणि बाहेरगावी निघून गेला.
वडिलांना रक्कम हस्तांतर झाल्याचे समजले. त्यामुळे ते तत्काळ विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी रक्कम परत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केला. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यामध्ये तत्काळ लक्ष घातले. उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी बँकेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. मुलाच्या खात्यामध्ये आलेली रक्कम थांबविण्यास सांगितले. तसेच, मुलाचा शोध सुरू केला. पण त्याचा फोन बंद होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरूच ठेवला होता, दरम्यान तो परत घरी आला. पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याच्याकडे चौकशी केली. त्या वेळी त्याने रागाच्या भरात असे कृत्य केल्याचे सांगितले. तसेच, या प्रकाराबाबत माफी मागितली. पोलिसांनी त्याला तसेच वडिलांनाही समजावून सांगितले.