म. टा. वृतसेवा, दौंड
बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी हॅट्ट्रिक साधून भाजपच्या कांचन कुल यांच्यावर विजय मिळवत माध्यमांमध्ये बहुचर्चित आणि लक्षवेधी ठरलेली ही लढत एकतर्फीच असल्याचे दाखवून दिले. कांचन कुल यांच्या पराभवाने कुल कुटुंबाचे पवारांच्या विरोधातील तिसरे बंड थंड झाले. महादेव जानकर यांच्या तुलनेत दौंडने 'रासप'चे आमदार राहुल कुल यांना फारच कमी साथ दिली.
'रासप'चे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी 'स्वाभिमानी दौंडकर' बनून बारामती मतदारसंघात परिवर्तनाची हाक दिली होती. परंतु, दौंडकरांनी अपेक्षित साथ न दिल्याने राहुल कुल यांच्या दौंड विधानसभा मतदारसंघातून कांचन कुल यांना फारच कमी मताधिक्य मिळाले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा व खासदार संजय काकडे यांचे भाकीत हवेतच विरून गेले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातून २,९५,६११ पैकी १,८९,२१६ (६४.१ टक्के) मतदान झाले होते. यापैकी कांचन कुल यांना ९०,७८९ मते मिळाले तर सुप्रिया सुळे यांना ८३,७६५ मतदान झाले (यात टपाली मतदानाचा समावेश नाही). कांचन कुल या दौंड तालुक्यातील उमेदवार असल्या, तरी त्यांना इथून केवळ सात हजार मतांच्या आसपास मताधिक्य मिळाले. २०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोदी लाट व धनगर आरक्षणाचा तापलेला मुद्दा यावर महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना दमदार लढत दिली होती. त्या निवडणुकीत दौंड तालुक्याने पवारांना धक्का देऊन जानकर यांना २५५४८ मतांची दणदणीत आघाडी दिली होती. या आघाडीमुळे राहुल कुल यांची विधानसभेची वाट सोपी झाली होती.
त्या वेळी कमळ हे चिन्ह न घेतल्याने महादेव जानकर दिल्ली गाठू शकले नाहीत, अशी भावना रासप व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरली होती. या वेळी मात्र, कमळाचे चिन्ह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांची साथ व रणनीती तसेच मोदी लाट असतानाही कुल व भाजपसाठी बारामतीमार्गे दिल्ली दूरच राहिली.
---
तळागाळातील प्रचाराचा फायदा
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली रणनीती बदलली होती. केवळ एक सांगता सभा न घेता सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची मोट बांधण्यासाठी प्रचाराच्या काळात दौंड तालुक्यात पूर्ण दिवसभरात पाटस, केडगाव, यवत, सहजपूर फाटा येथे कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता. घोंगडी बैठका व प्रत्यक्ष जनसंपर्क याचाही राष्ट्रवादीला फायदा झाला. राहुल कुल व भाजपच्या आक्रमक प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसने संयमित व तळागाळात प्रचार करून उत्तर दिले.