अ‍ॅपशहर

धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण अजून सुरूच

पावसाळा निम्मा संपला असला तरी पालिकेचे धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. मध्यवर्ती पेठांमध्ये सुमारे ३८४ वाडे धोकादायक अवस्थेत असून, त्यापैकी‌ ११३ वाड्यांमध्ये आजही नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेनेच प्रश्नोत्तरामध्ये या विषयी कबुली दिली आहे.

Maharashtra Times 26 Aug 2017, 4:51 am
३८४ वाडे धोकादायक अवस्थेत; पालिकेची कबुली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dangerous wada checking still continuous
धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण अजून सुरूच


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा निम्मा संपला असला तरी पालिकेचे धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. मध्यवर्ती पेठांमध्ये सुमारे ३८४ वाडे धोकादायक अवस्थेत असून, त्यापैकी‌ ११३ वाड्यांमध्ये आजही नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेनेच प्रश्नोत्तरामध्ये या विषयी कबुली दिली आहे.
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नारायण, सदाशिव, शनिवार अशा सुमारे १६ पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात जुने वाडे आहेत. यातील अनेक वाडे धोकादायक अवस्थेत असून, वारंवार नोटीस देऊनही वाडे ‘जैसे थे’च आहेत. पावसाळ्यात हे वाडे कोसळण्याची भीती असते. त्यामुळे पालिका दरवर्षी धोकादायक वाड्यांची पाहणी करून नोटीस बजावितात. राहण्यास योग्य नसलेल्या आणि धोकादायक झालेल्या वाड्यांच्या मालकांना तसेच ‌‌तेथील भाडेकरूनंना पालिकेकडून नोटीस दिली जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून भाडेकरू वाडा सोडत नसल्याचे समोर आले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून संबधितांवर कारवाई करण्याची घोषणा बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, निम्मा पावसाळा संपत आला तरीही धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मध्यवर्ती भागात एकूण ३८४ वाडे धोकादायक स्थितीत आहेत. त्यापैकी २२४ वाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित पाहणी सुरू आहे. यापैकी १११ वाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ११३ धोकादायक वाडे रिकामे झाले नसल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी या विषयी विचारणा केली होती. काही नागरिक वाड्यांमध्ये भाडेकरू म्हणून ५० ते ६० वर्षापासून राहतात. वाडा सोडल्यास जागेवरील हक्क जाईल, ही भीती बहुतांश जणांच्या मनात असल्याने वाड्यांमध्ये नागरिक जीव मुठीत धरून राहत असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार काही भाडेकरूंना त्यांच्या मागणीनुसार राहत्या घराचे चटई क्षेत्र प्रमाणपत्र (संबंधित वाड्यात भाडेकरूचे क्षेत्रफळ) देण्यात आले आहे. त्यामुळे भाडेकरूंचा त्यांच्या जागेवरील हक्क अबाधित राहणार असून, हे प्रमाणपत्र न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येणार आहे. तरीही भाडेकरू वाडे सोडण्यास तयार नसल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज