म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली असून, विद्यार्थ्यांना आता १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी; तसेच कला किंवा क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार होता. मात्र, आता अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. या मंडळाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुले, प्रौढ कामगार, गृहिणी या सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान भरता येणार आहे. तर, २ ते १८ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करायचे आहेत. संपर्क केंद्र, शाळांनी २१ सप्टेंबरला विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना http://msbos.mh-ssc.ac.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली.
मुक्त विद्यालयासाठी प्रवेश पात्रता
- इयत्ता पाचवी : वय वर्षे १०, आठवी : वय वर्षे १३
- मार्च-एप्रिल व ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार परीक्षा, दोन्हीपैकी कोणत्याही परीक्षेला बसायचे असल्यास ६ महिने आधी नोंदणी करावी लागणार.
- एकदा केलेली नोंदणी ५ वर्षे वैध, एकूण ९ परीक्षांची मिळणार संधी.
...
विषय योजना :
पाचवी : ३ भाषा, परिसर, गणित.
आठवी : ३ भाषा, सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित, कौशल्य विकास, दिव्यांगांसाठी विशेष विषय.