डॉ. श्रीराम गीत
सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी करिअरविषयक व्याख्यानांसाठी मी जेव्हा सुरुवात केली (म्हणजे बोलावले, तरच) तेव्हा दोन गोष्टींमधून, दोन उदाहरणांतून कायमच सुरुवात करत असे. पहिले असायचे 'डेक्कन क्वीन'चे. त्या वेळी श्रोत्यांना मी एक प्रश्न विचारत असे. समजा उद्या तुम्हाला मुंबईला जायचे आहे, तर कसे जाल? गंमतीची गोष्ट म्हणजे एकमुखाने प्रत्येक वेळी उत्तर येत असे... डेक्कन क्वीनने!
प्रत्येकाच्या मनात करिअरची अशीच डेक्कन क्वीन पक्की बसलेली असते ना? मग माझा पुढचा प्रश्न असे, उद्याच्या डेक्कन क्वीनचे आरक्षण मिळते का? आता श्रोते अंतर्मुख होण्यास सुरुवात होत असत. पुढचा प्रश्न असे, मग काय करणार? अर्थातच, ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार उत्तरांची यादी तयार होऊ लागे.
लवकर जाऊन 'सिंहगड' पकडेन. सह्याद्री, चेन्नई, सिकंदराबादमध्ये उभे राहून प्रवास करणे शक्य आहे. टॅक्सी करून जाईन. समोरच स्टँड आहे. दुसरा कोणीतरी पुटपुटे, ते फार महाग पडते. शेजारी एशियाड स्टँड आहेच की! (त्या वेळी शिवनेरी, शिवशाही नव्हत्या. मात्र, एशियाड हाच एकमेव रुबाब होता.)
आता सारी यादी संपली, की मी माहिती पुरवत असे. रोज १०.३० वाजता पुणे-कर्जत पॅसेंजर सुटते. ती अडीचला कर्जतला जाते व तिथे कनेक्टिंग लोकल मिळते. चार- साडेचारला मुंबई गाठता येते. आता माझा प्रतिप्रश्न असे, यादी झाली, परिपूर्ण झाली. मात्र, एकानेही मुंबईला का जायचे, कधी पोचायचे, तिथे करायचे काय हा प्रश्न विचारलासुद्धा नाही. असे आपण निरर्थक जर्नीला निघतो का? पाहा क्षणभर विचार करून. चला बॅग उचला अन् स्टेशनवर जाऊन समोर उभ्या असलेल्या गाडीत कोणी बसते का? अगदी अत्यंत आकर्षक डेक्कन क्वीन समोर उभी असली; तरीही?
हा एवढा विचार करिअरसंदर्भात सर्वांनी करायचा असतो. तो केला, तर प्रत्येकाचा प्रवास फास्ट, सुपरफास्ट किंवा बैलगाडीतूनही 'हॅपी जर्नी' असाच होतो. गंतव्यस्थान माहिती करून घ्या, नक्की पोचालच. उदाहरणातून आपण हे स्पष्ट करू या. असे किमान डझनभर विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
आठवी-नववीत ५५ टक्के, गणित कच्चे. दहावी पहिल्या प्रयत्नात पास ५९ टक्क्यांनी. त्याला 'एमसीव्हीसी' (किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम) बारावीचा इलेक्ट्रिकल मेंटेनन्स हा अभ्यासक्रम सुचवला. त्यादरम्यान गणित सुधारण्याचे प्रयत्न सुचवले. दहावीचे गुण १० टक्के वाढले. तांत्रिकी ज्ञान वाढले. आत्मविश्वास वाढला. गणिताची भीती गेली. त्यानंतर त्याला डिप्लोमा इलेक्ट्रिकलला प्रवेश घ्यायला सांगितला. मात्र, कॉलेज दुसऱ्या वर्षाला बसवत असून, पहिल्या वर्षाला तो प्रवेशित झाला. दरवर्षी ६५-७० टक्के मिळवून डिप्लोमा पूर्ण झाला. आता घराला पदवीचे वेध लागले होते. त्यांना थांबवले. पदवीसाठीचे गणित आपल्याकडे नाही हे त्यांना पटले. तो कामाला लागला. पाच वर्षे उत्तम काम करून पुन्हा भेटला. पुढे काय करू?
'पीजीडीबीएम'चा रस्ता त्याला सांगितला. आज तो एका छोट्या इलेक्ट्रिकल कंपनीत छानशा पदावर, उत्तम पगारावर काम करत आहे. त्याच्या हाताखाली सुमारे २५ इलेक्ट्रिकल पदवीधर इंजीनिअर कामात आहेत. याउलट, ७२ टक्के मार्क गणित कच्चे अशा त्याच वेळच्या दुसऱ्या मुलाने हट्टाने डेक्कन क्वीन पकडली. बारावीला काठावर पास झाला. डिप्लोमाला दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला; म्हणून घेतला. तीन वर्षांनी डिप्लोमा सोडून दिला. मुंबईला का पोहोचायचे, कधी पोहोचायचे व काय करायचे हे पहिल्याचे पक्के होते. दुसऱ्यासमोर सायन्स- जास्त स्कोप, इंजीनिअर- भरपूर पगार- अमेरिका असे फक्त स्वप्न होते.
यंदाच्या दहावीच्या नाही, तर बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने कुठे पोहोचायचे याचा नीट विचार करावा.
(पुढील भाग उद्याच्या अंकात)