साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'समाजातील दुषणांवर बोट ठेवण्याचे, त्याविषयी भाष्य करण्याचे सामर्थ्य रुपक कथांमध्ये असते. वास्तववादी कथांपेक्षा रुपक कथा कालातीत असतात. वास्तववादी कथांचे संदर्भ काळाच्या उदरात गडप होत असल्यामुळे त्यांचे आयुर्मान रुपक कथांच्या तुलनेत कमी असते,' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. 'विचार करणारे लेखक आणि लेखिका आपल्याकडे कमी आहेत. जीवनदर्शनातून लेखकाची भूमिका तयार होते,' अशी टिप्पणी त्यांनी केली.
दिलीपराज प्रकाशनातर्फे लेखिका रेखा बैजल यांच्या 'ज्ञातापलीकडले' या कथासंग्रहाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. समीक्षक डॉ. अश्विनी धोंगडे, लेखिका नीलिमा बोरवणकर, दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे, शिवकुमार बैजल उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, 'रूपक कथांमधून जीवनाचे अनेक अज्ञात पैलू पुढे येतात. वि. स. खांडेकरांनी अशा रुपकांचा आपल्या खास शैलीत उत्तम वापर केलेला दिसून येतो. जीवनाचे चिंतन रुपककथांमधून मांडलेले असते. रुपके हा रेखा बैजल यांच्या कथांचा आत्मा आहे. त्यामध्ये वाङ्मय मूल्य आहे, त्याचप्रमाणे आत्माविष्काराच्या माध्यमातून आत्मशोध घेण्याचा प्रयत्नही आहे.'
धोंगडे म्हणाल्या, 'कथालेखन अवघड साहित्य प्रकार आहे. एका सूत्राचा विस्तार योग्य त्या शब्दसंख्येत करताना वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कथालेखकांमध्ये असते. जीवनविषयक विविध कोन आणि आयाम कथांच्या माध्यमातून मांडता येतात. कथालेखन हे एखाद्या पाषाणातून मूर्ती घडविण्यासारखीच कला आहे. कथा ही कादंबरी आणि कवितेमधील आशयबंध आहे. कथा मनोरंजनासाठी नसते. बैजल यांच्या लेखनामध्ये आशयसूत्र आहे.'
बोरवणकर यांनी बैजल यांच्या लेखनाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन आराधना कुलकर्णी यांनी केले.
-----------