म. टा. प्रतिनिधी, पुणे
'गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या केंद्र सरकारला दिल्लीपर्यंतचा विजयी रस्ता सरळ होता. या निवडणुकीत हा रस्ता मात्र व्हाया अयोध्याच जाणार आहे,' असे सांगत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमचंद सावला यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारबरोबरच भाजपलाही इशारा दिला. सरकारला पुन्हा सत्तेत यावेसे वाटत असेल; तर राम मंदिर उभारावेच लागेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या पुणे विभागातर्फे आयोजित धर्मसभेत रविवारी ते बोलत होते. कागशिला पिठाधीश्वर महंत साध्वी प्रज्ञा भारतीय, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, दादा वेदक, पांडुरंग राऊत, रवींद्र वंजारवाडकर, सभेचे संयोजक किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ खासदार अनिल शिरोळे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात शिरोळे यांना राममंदिर निर्माण कायद्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. सभेमध्ये दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
'कोणतेही न्यायालय किंवा विज्ञान कोणत्याही धर्मातील लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेबद्दल शंका उपस्थित करू शकत नाही. राममंदिर आणि रामजन्मभूमी हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. त्यावर कोणत्याही न्यायालयात निर्णय होणे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. न्यायालयाने रामजन्मभूमी असल्याचे मान्य करूनही, सरकार कायदा का करत नाही, असा प्रश्न सावला यांनी उपस्थित केला. ज्याप्रमाणे सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून वल्लभभाई पटेल यांनी मंदिराच्या उभारणीकरीता पुढाकार घेतला; त्याप्रमाणे खरेतर आजच्या स्वाभिमानी सरकारने विधेयक आणून मंदिर बनवायला हवे,' याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
साध्वी प्रज्ञा भारतीय म्हणाल्या, 'भारत देश स्वतंत्र झाला, नागरिक स्वतंत्र झाले, मात्र आजही रामलल्ला स्वतंत्र नाही. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर निर्माणाकरीता पुढाकार घ्यायला हवा. राज्य व केंद्र सरकारने जर ठरविले, तर मंदिर उभारणी सहज शक्य आहे. मात्र, मंदिर उभारणी झाली, तर निवडणुकीत मते मागायला मुद्दा राहणार नाही. जो रामाचे काम करेल, त्यालाच आपण मत देऊ असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा.' मंदार परळीकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत चिल्लाळ यांनी आभार मानले.