म. टा. प्रतिनिधी, पुणे
अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात सोसायट्यांच्या सीमाभिंती वाहून गेल्या असून त्या बांधण्यासाठी राज्य सरकारने ७० कोटी रुपयांचा निधी द्यावा; तसेच या पुरात बाधित झालेल्या सुमारे साडेचार हजार नागरिकांना किमान १५ हजार रुपयांची मदत द्यावी, याबरोबरच शहरातील विविध प्रश्नांसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. राज्य सरकारकडून महापालिकेला मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सातत्याने पाठपुरावा करील, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त शान्तनु गोयल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त जयश्री लाभशेटवार यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. महापौर मोहोळ यांनी या बैठकीची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्यात आली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये लवकरच मिळणार आहेत. या घटनेत ४७२१ नागरिक बाधित झाले आहेत. यातील ४३०५ नागरिकांना पाच हजार रुपयांची मदत मिळाली आहे; तर त्यांना उर्वरित १० हजार रुपये मिळावेत, अशी मागणी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. अद्यापही ४१६ नागरिकांना मदत मिळाली नसून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेने या दुर्घटनेमुळे नाला खोलीकरण, कल्व्हर्ट दुरुस्ती, ड्रेनेज लाइन टाकणे, सीमाभिंती बांधणे आदी कामांसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, खासगी सोसायट्यांच्या सीमाभिंती बांधणे हे महापालिकेच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यास राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. सरकारकडून ७० कोटी रुपये उपलब्ध व्हावेत, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली असून त्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. या कामाचे अंदाजपत्रक आणि कागदपत्रे उपलब्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
....
'भूसंपादनामध्ये अडचणी'
समान पाणीपुरवठा योजनेसाठी कृषी महाविद्यालयाकडून जागा मिळण्यास अडचण येत आहे. तसेच, संगमवाडी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी ९६ कोटींपैकी ३० टक्के रक्कम महापालिकेने भरली आहे. यासंदर्भातही पुढील कार्यवाही व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी 'एनडीए'कडे १७ कोटी रुपये भरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. या उड्डाणपुलाच्या जागेच्या भूसंपादनासाठी संरक्षण खात्याकडून जागा मिळण्यात अडचणी येत असून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.
..........