म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे,' अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. लोकसभेच्या शून्य प्रहर चर्चेत सहभाग घेऊन त्यांनी ही मागणी केली.
खासदार बारणे म्हणाले, 'महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला. ते सत्यशोधक समाजाचे प्रणेते होते. जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मोठे काम केले आहे. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची त्यांनी मांडणी केली. भारतीय विचारक, समाजसुधारक, लेखक अशी त्यांची ओळख आहे. ब्रिटिशकाळात शेतकऱ्यांची बाजू परखडपणे मांडणारे, महिला तसेच विधवांसाठी काम करणारे जोतिबा फुले महान समाजसुधारक होते. त्यांच्या कार्याचा गौरव होणे काळाची गरज आहे.'
बारणे म्हणाले, 'महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा जोतिबा फुले यांनी रोवली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी कठीण परिस्थितीत खंबीर साथ दिली. महिलांना शिक्षण देण्याचे काम केले. त्या काळी महिलांना घराबाहेर पडण्याचीदेखील मुभा नव्हती. शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य ही तर फार दूरची बाब होती. अशा काळात सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात शाळा सुरू करून महिलांना साक्षर केले. त्यामुळे या दाम्पत्याला केंद्र सरकारने 'भारतरत्न' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा.'