म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतासारख्या कृषिप्रधान देशात आजपर्यंत वेगवेगळ्या क्रांती झाल्या; पण पेटंट क्षेत्रात अद्याप क्रांती झाली नाही. आपल्या देशात ढोबळमानाने आजही अशी सुमारे १० हजार कृषी उत्पन्ने आहेत, की ज्यांना पेटंट मिळवून देणे शक्य आहे. पेटंट हा गंभीर विषय आहे; परंतु भारतीयांमध्ये पेटंटविषयी गांभीर्य नाही. त्यामुळेच पेटंटविषयीची अनास्था म्हणजे भारतीय सार्वभौमत्वापुढील आव्हान आहे, अशी खंत पेटंटतज्ज्ञ अॅड. प्रा. गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केली.
दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनतर्फे हिंगमिरे यांना दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार 'मसाप'चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पद्माकर मोरे, मनोहर कोलते, विक्रम जाधव, अमर परदेशी आदी या वेळी उपस्थित होते. महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार आणि गोंदिया जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील कलावंत विद्यार्थी राहुल ठाकरे यांचाही सन्मान करण्यात आला.
'पेटंटच्या जीवावर बहुराष्ट्रीय कंपन्या आज आपल्या खिशातून नकळत अनेक पैसे काढून घेतात. ही गोष्ट आपल्या लक्षातही येत नाही. अस्सल भारतीय असलेल्या चपातीचे पेटंट १९४५मध्ये एका ब्रिटिश नागरिकाने मिळवून दिले. एका ब्रिटिशाने ही गोष्ट करणे म्हणजे भारतीयांसाठी मोठी शोकांतिका आहे. जपानसारख्या प्रगत देशात इयत्ता सातवीपासून पेटंट आणि इतर बौद्धिक संपदा विषयांचा समावेश अभ्यासक्रमात केलेला दिसतो. आपल्याकडे मात्र इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या मुलालाही पेटंटविषयी फारसे ज्ञान आणि माहिती नसते,' असे हिंगमिरे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले, विक्रम जाधव यांनी आभार मानले.
पगडीची इच्छाही पूर्ण झाली
काही वर्षांपूर्वी हिंगमिरे यांनी पुण्याच्या पगडीला पेटंट मिळवून दिले होते. त्या विषयी ते म्हणाले, 'पुणेरी पगडीला पेटंट मिळवून दिले, तरी अनेक वर्षे कोणी सत्कार म्हणून माझ्या डोक्यावर पुणेरी पगडी घातली नव्हती. या सत्कारामुळे ती इच्छाही पूर्ण झाली असून, यापुढे अस्सल भारतीय असलेल्या वस्तूंची पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहीन.'