म. टा. प्रतिनिधी, जालना :
जालन्यात 'आमरस पे चर्चा' या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शहरातील व्यापारी सहभागी झाले होते. याप्रसंगी खासदार रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार राज पुरोहित, उद्योजक सुनील रायठठ्ठा, विरेंद्र धोका, घनश्याम गोयल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
आयुष्यात कधीच कोणाला गणपतीची वर्गणी मागितली नाही. जालन्यातील माजलेल्या गुंडांना घरात कोंडून कुटून पोलिसांच्या हवाली केले आहे. सगळ्या व्यापाऱ्यांना माहित आहे. या चार वर्षांत जालन्याचा कायापालट झाला आहे. ड्रायपोर्ट, आयसीटी कॉलेज, सिडको, सीडपार्क या सर्व विकास योजना पूर्ण करण्यासाठी आपल्याला निवडून द्या असे आवाहन दानवे यांनी याप्रसंगी केले. यापुढे आतापर्यंत केलेले काम पूर्ण करण्यासाठी आपण काम करू असे ते म्हणाले.
जालना शहरात सात वर्षे पथदिवे बंद, महिना-महिना पाणी पुरवठा होत नाही, तरी तुम्ही त्यांनाच पालिकेत निवडून देता, या शब्दांत पालिकेतील काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दानवे यांनी पहिल्यांदा तोफ डागली.
विरोधात काँग्रेसला उमेदवार सापडत नव्हता: दानवे
आपल्या विरोधात काँग्रेसला उमेदवार सापडत नव्हता. त्यांना दवंडी द्यावी लागली. आता हा उभा उमेदवार बळजबरीने उभा केला असल्याचे दानवे यांनी सांगितले. सिल्लोडमध्ये आपल्याला कधीच मताधिक्य मिळाले नाही. आता मात्र, सिल्लोडमध्ये आपल्याला पसंती असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.