अ‍ॅपशहर

मराठी भाषेची उपेक्षा का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वक्तव्याने प्रसिद्धीच्या झोत्यात आलेले साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा मोदींशी ‘मन की बात’ करून काही सवाल उपस्थित केले आहेत.

Maharashtra Times 31 Aug 2016, 3:00 am
सबनीसांची पंतप्रधानांशी ‘मन की बात’; ‘मसाप’वर कुरघोडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dr shreepal sabanis wrote letter to narendra modi
मराठी भाषेची उपेक्षा का ?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वक्तव्याने प्रसिद्धीच्या झोत्यात आलेले साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा मोदींशी ‘मन की बात’ करून काही सवाल उपस्थित केले आहेत. ‘मोदीजी तुम्ही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयी घेतलेल्या भूमिकेने मी प्रभावित झालो आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा अद्याप मिळालेला नाही. बलुचिस्तानच्या नागरिकांचे स्वातंत्र्य तुम्हाला अपेक्षित आहे, पण अकरा कोटी मराठी जनतेच्या मराठी भाषेची उपेक्षा का?’ असा रोकडा सवाल सबनीस यांनी मोदींना पत्रातून केला आहे. पंतप्रधानांना वैयक्तिक पत्र पाठवून सबनीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेवर कुरघोडी केली आहे.
जानेवारीत झालेल्या साहित्य संमेलनाआधी मोदींच्या पाकिस्तानदौऱ्याबाबत वक्तव्य करून सबनीस अडचणीत आले होते. त्यानंतर सबनीस विविध कारणांनी चर्चेत राहिले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारकडे पडून आहे. या पार्श्वभूमीवर सबनीस यांनी पंतप्रधान मोदींशी ‘मन की बात’ करण्यासाठी त्यांना पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे याच मागणीसाठी साहित्य परिषदेत गेल्या आठवड्यात लेखकांची बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधानांना पत्र पाठवण्याचे ठरले होते. त्याआधी सबनीस यांनी वैयक्तिक पत्र पाठवून साहित्य परिषदेवर कुरघोडी साधली आहे. साहित्य वर्तुळात त्यांच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
‘भारतीय स्वातंत्र्य दिनी बलुचिस्तानच्या लोकांच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊन आपण इतिहास निर्माण केला आहे. आता पाकिस्तानला काश्मीर शिवाय पाकव्याप्त काश्मीरसाठी झुंजावे लागेल. आपल्या राष्ट्रनिष्ठ भूमिकेमुळे मी प्रभावित झालो असून, मी त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. मी तुमच्याशी ‘मन की बात’ करू इच्छितो. मराठी भाषा सर्व निकषांवर पात्र ठरूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही, बलुची नागरिकांचे स्वातंत्र्य तुम्हाला अपेक्षित आहे, पण अकरा कोटी मराठी लोकांच्या उपेक्षेचे काय, आपण सह्रदयी असूनही, आमचे सांस्कृतिक दु:ख का समजत नाहीत?’ असे सवाल सबनीस यांनी पंतप्रधानांना केले आहेत.
‘संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, रानडे-आगरकर-डॉ. आंबेडकर यांचा महाराष्ट्र मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेचा सन्मान करावा,’ अशी विनंती सबनीस यांनी पंतप्रधानांना केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज