म. टा. प्रतिनिधी, पुणे
'वाचनातून जे ज्ञान मिळते, ते कष्टसाध्य आहे, म्हणून त्याचे महत्त्व जास्त आहे. सध्या इंटरनेटवरून ज्ञान ग्रहण करण्याचे प्रयत्न होतात. इंटरनेटवरून मिळालेले ज्ञान मनाच्या संग्रहात राहतेच असे नाही. सध्याची स्थिती पाहिली तर इंटरनेटमुळे वाचन आणि व्यासंग कमी झाला आहे,' अशी खंत मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी मंगळवारी व्यक्त केली. 'तरुणांमध्ये वाचनाची सवय वृद्धिंगत व्हायला हवी,' असेही त्यांनी सांगितले.
प्रसाद प्रकाशन, अनाहत प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. देगलूरकर बोलत होते. कार्यक्रमात वैदिक संशोधन मंडळाच्या संचालिका डॉ. भाग्यलता पाटसकर व गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रमात मृगपक्षिशास्त्र, अंगलक्षण होराशास्त्र, ओंकार किमया, कलियुग, महारसायन, कृष्णकथा यासह सहा बालकथांच्या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, पंडित वसंत गाडगीळ, प्रसाद प्रकाशनाच्या डॉ. उमा बोडस आदी या वेळी उपस्थित होते.
'विद्वानांना एकत्र आणणे, त्यांच्यात चर्चा घडविणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने विद्वानांचे महागठबंधन व्हायला हवे. बुद्धीला, मनाला, भक्तीला आणि विचाराला चालना देण्याचे काम विद्वान करत असतात. विद्वान आपापल्या क्षेत्रात गती प्राप्त केलेले असतात. विद्वान एकत्रित आले तर विविध क्षेत्राचे सारभूत ज्ञान एकाच ठिकाणी मिळेल आणि ज्ञानप्रक्रियेला गती मिळेल,' असे डॉ. देगलूरकर यांनी सांगितले. डॉ. मुकुंद दातार यांनी शास्त्राची संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले,'आपल्याकडे शास्त्र म्हणजे विज्ञान, अशी व्याख्या केली जाते. सायन्स शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे शास्त्र, असे संबोधतो. पण शास्त्राची व्याख्या एवढीच मर्यादित नाही. भारतीय परंपरेत तत्त्वज्ञान, अध्यात्म, विचार आणि विज्ञान यामुळे एक भारतीय शास्त्रपद्धती निर्माण झाली आहे. ती आजच्या काळात लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचा विसर पडत चालला आहे.' पं. वसंतराव गाडगीळ, डॉ. अशोक कामत यांनीही आपले विचार मांडले. सुवर्णा बोडस यांनी निवेदन केले.
-------------------
फोटो कल्पेश