प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी विद्यापीठाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
दर वर्षी महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या गोंधळातून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश समन्वयक नेमण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून, त्यानुसार सर्व संलग्न संस्था, संशोधन केंद्रांना परिपत्रक पाठवून आदेश देण्यात आले आहेत.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, परिसंस्थेतील प्रवेशप्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन महाविद्यालय स्तरावर राबवण्यात येतात. या वेळी माहितीअभावी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश रद्द करून कागदपत्रांची व शुल्काची परत मागणी करणे याबाबतच्या नियमांची विद्यार्थ्यांना माहितीच नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. यासंदर्भातील अनेक तक्रारी विद्यापीठाकडे करण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर शुल्क व कागदपत्रांच्या बाबतीत विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येऊ नये, यासाठी महाविद्यालय स्तरावर सुसूत्रीकरण यंत्रणा असावी, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या होत्या. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया, विविध शिष्यवृत्ती योजना याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रियेत अधिक सुसूत्रता निर्माण होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश समन्वयक नियुक्त केल्यास विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण महाविद्यालय स्तरावरच करता येईल. त्यासाठी महाविद्यालय प्रवेश समन्वयकाची नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी, असा आदेश शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी दिले आहेत.
\B
असे आहेत निकष
\Bमहाविद्यालय प्रवेश समन्वयक पदाची जबाबदारी अनुभवी प्राध्यापकावर सोपविण्यात यावी. त्यासाठी संबंधित प्राध्यापकाकडे अध्यापनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. नियुक्ती किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी केली जावी. संबंधित प्राध्यापक महाविद्यालय प्रवेश समितीचा पदसिद्ध सचिव असेल.
\Bसमन्वयकाची जबाबदारी
\Bमहाविद्यालय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करणे, प्रवेशाच्या कामकाजात समन्वय राखणे, विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासंदर्भात प्राप्त झालेली परिपत्रके, सूचना इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना देणे, सरकारच्या व विद्यापीठाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देणे; तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे आदी जबाबदाऱ्या प्रवेश समन्वयकाला पार पाडाव्या लागतील.