नोटाबंदी, जीएसटीमुळे मागणी घटल्याचा सिन्हांचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'नोटाबंदी आणि जीएसटीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेसह कृषी, बांधकाम आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची वाढ खुंटली असून, कॉर्पोरेट क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे मागणी नामक अर्थव्यवस्थेचे इंजिन क्रॅश झाले आहे,' असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. 'कंपन्यांच्या करात कपात केल्यामुळे चारशे कोटींची उलाढाल असलेल्या अवघ्या ०.७ टक्के कंपन्यांचा फायदा होईल; पण ग्रामीण भागातील मागणी वाढणार आहे का, मध्यमवर्गीयांच्या खिशात पैसे येणार आहेत का', असे सवाल करून सिन्हा यांनी मंदीच्या समस्येवर चुकीचे उपचार केले जात असल्याची नाराजी व्यक्त केली.
'गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थे'तर्फे आयोजित 'इकॉनॉमिक स्लोडाउन : स्ट्रक्चरल ऑर सायक्लिक' या विषयावर सिन्हा यांनी सोमवारी आपले मत मांडले. संस्थेच्या प्रा. संगीता श्रॉफ या वेळी उपस्थित होत्या.
सिन्हा म्हणाले, 'कृषी क्षेत्र संकटात असल्याने ग्रामीण भागातील उत्पन्नवाढ घटली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्र, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, नोकऱ्यांची संख्या घटली आहे. असंघटित क्षेत्राची अर्थव्यवस्थाही उद्ध्वस्त झाली आहे. कारखाने बंद पडल्याने कामगारांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मनरेगासारख्या योजनांमध्ये काम करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. या सर्व बाबींचा परिणाम कॉर्पोरेट क्षेत्रावर झाला असून, तेथील मागणी घटली आहे. त्यामुळे गुंतवणूक वाढत नसून, देश आर्थिक मंदीच्या चक्रात अडकला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी पायाभूत प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे.'
...
'आकडेवारी विश्वासार्ह नाही'
केंद्र सरकारने 'जीडीपी' मोजण्याचे निकष बदलल्याने अर्थव्यवस्थेची माहिती देणारी आकडेवारीही आता विश्वासार्ह राहिली नसल्याची खंतही सिन्हा यांनी व्यक्त केली. जीडीपी मोजण्याच्या नव्या निकषांमुळे गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारची अर्थविषयक कामगिरी दमदार असल्याचे दिसून येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. देशांतर्गत बाजारपेठेच्या वृद्धीतूनच आठ टक्के वाढीचा दर गाठता येईल; परदेशी गुंतवणुकीतून नाही, असेही ते म्हणाले.
...
देश निषेध करायचे विसरला असून, जर कोणी निषेध केला तर त्याला देशद्रोही ठरविले जाते. पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यावर निषेध व्यक्त केला जायचा; पण आता कोणीही करत नाही. कारण, तसे केल्यास देशद्रोही ठरविले जाते.
यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय अर्थमंत्री