अजित पवारांची राज्य सरकारवर टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आम्ही सत्तेत असताना मुठा उजव्या कालव्यातून गाळ काढला होता. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांना, पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना लोकांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाही. त्यांना निवडणुका महत्त्वाच्या वाटतात,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
दांडेकर पुलाजवळच्या वस्त्यांची पाहणी केल्यावर पवार पत्रकारांशी बोलत होते. कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने पुणेकरांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. त्यासाठी जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तसेच संबंधित कंत्राटदारालाही काळ्या यादीत टाकावे आणि जलसंपदा विभाग तसेच पालिकेने नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पुणेकरांसाठी आणि शेतीसाठी राखून ठेवलेले पाणी वाया गेल्याबद्दल राज्यकर्ते आणि महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही त्यांनी केली.
.
पालकमंत्र्यांनाही टोला
खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत बोगद्याातून पाणी नेण्याची केवळ घोषणा करून पेपरबाजी करू नका, असे सुनावतानाच काम करून घेण्याची धमक असावी लागते, आदेश दिल्यावर प्रशासनाने हलले पाहिजे. मात्र, प्रशासन त्यांचे ऐकतच नाही, असा टोलाही पवारांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना लगावला.
...
'उपाययोजनांवर भर द्यावा'
कालव्याजवळ वस्ती वाढल्याने लोक वाहून जाणे, घरात पाणी घुसणे असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे बंद जलवाहिनीसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. या घटनेची सखोल चौकशी होईलच. या प्रकाराची जबाबदारी सर्वस्वी पालिका आणि जलसंपदा विभागाची आहे. या घटनेवरून केवळ आरोप-प्रत्यारोप न करता ग्रस्तांना नुकसानभरपाई कशी देता येईल, यावर भर दिला पाहिजे. अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
...
तातडीने भरपाई द्यावी
जलसंपदा खात्याच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून, सरकारने जबाबदारांवर कारवाई करावी. बाधित कुटुंबीयांना तातडीने भरपाई देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. कालवा फुटीनंतर शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक आबा बागूल, रवींद्र धंगेकर आदींनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन दिले.
...
कालवा फुटल्याचा प्रकार दुर्दैवी आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. खडकवासल्यातून कालव्यात पाण्याचा विसर्ग थांबविला असून, लवकरात लवकर दुरुस्ती सुरू केली जाईल.
- अनिल शिरोळे, खासदार