म. टा. प्रतिनिधी, पुणे
करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्व वाहतूक ठप्प झाले आहे. त्यामुळे अत्यावश्यक आणि तातडीच्या कामासाठी सुरू करण्यात आलेल्या रिक्षा सेवेचा फायदा गेल्या चार दिवसांमध्ये ८६६ गरजू नागरिकांनी घेतला आहे.
पोलिसांनी संपूर्ण शहरात संचारबंदी लागू केली आहे. करोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक असलेली पीएमपी, रेल्वे, एसटी यासह शहरातील कॅब, रिक्षा तसेच नागरिकांना आपली खासगी वाहने वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या कामासाठी एका ठिकाणावरून दुसरीकडे जाणे सर्वसामान्य नागरिकांना अवघड होत आहे. वैद्यकीय तसेच इतर महत्त्वाच्या कामांसाठी जाणे नागरिकांना अशक्य होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात येत होत्या. हे प्रकार कमी व्हावे आणि महत्वाच्या कामासाठी नागरिकांना जाता यावे, यासाठी वाहतूक पोलिस आणि सिटीग्लाइड यांच्यामार्फत १८० ऑटो रिक्षांना वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
ही सेवा सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवासांमध्ये आठ हजार १३२ नागरिकांनी या सेवेसाठी कॉल केले होते. त्याची शहानिशा करून ८६६ गरजूंना या सेवेचा फायदा दिल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त (वाहतूक) डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
नागरिकांच्या सोयीसाठी या रिक्षांना ही वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केवळ एकच प्रवाशाची वाहतूक करणे बंधनकारक आहे. या सेवेचा फायदा घेण्यासाठी ९८५९१९८५९१ या मोबाइल क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधायचा आहे. त्यावर संपर्क साधल्यानंतर या नागरिकांची संपूर्ण माहिती घेतली जाते. प्रवास कोणत्या कारणासाठी करायचा आहे, याची शहानिशा करून त्यानंतर ही सेवा मिळू शकते की नाही, हे सांगितले जाते.
'ही अत्यावश्यक सेवा पुरविणारे रिक्षा चालक हे ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यांची रिक्षा ही सॅनिटाइज केलेली असते. प्रवास करताना चालक आणि प्रवासी यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच, रिक्षा चालकाने रिक्षात हॅँड सनिटायझर उपलब्ध करून द्यावे,' अशा सूचना करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
.
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक तसेच तातडीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागरिकांनी ९८५९१९८५९१ या क्रमांकावर संपर्क साधून ही सेवा घ्यावी.
- डॉ. संजय शिंदे
अपर पोलिस आयुक्त (वाहतूक)