म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
भामा आसखेड धरणाच्या पाण्यात धरणग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केली. 'एनडीआरएफ'च्या जवानांनी सायंकाळी धरणातून या शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढला. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
ज्ञानेश्वर शांताराम सुतार (वय ३७, रा. रौंधळवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुतार यांना दोन पत्नी असून एक मुंबई व दुसरी गावी राहते. त्यांची दोन्ही मुले डेहणे गावी शालेय शिक्षणासाठी आहेत. संबंधित शेतकरी पुनर्वसनासाठी पात्र ठरलेला असून त्याचे पुनर्वसन पात्रता यादीत नाव आहे. दरम्यान पुनर्वसनास विलंब होत असल्यामुळेच संबंधित शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.
रौंधळवाडी हद्दीत भामा आसखेड धरणाच्या पाण्यात शनिवारी सकाळी काही महिला कपडे धूत होत्या. या वेळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुतार तेथे आले. ते ही पाण्याकडेला बसले. मात्र, काही वेळानंतर ते पाण्यात बुडत असल्याचे संबंधित महिलांच्या लक्षात आले. महिलांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांनी पाणबुड्यांच्या साह्याने सुतार यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रशासनाने 'एनडीआरएफ'ला पाचारण केले. यानंतर सायंकाळी सहा वाजता त्यांचा मृतदेह सापडला.
'हा सरकारच्या नाकर्तेपणाचा बळी आहे. उच्च न्यायालयाने चारशे भामा आसखेड धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करून जमिनी देण्यास टाळाटाळ करत आहे. हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे,' अशी टीका धरणग्रस्त कृती समितीचे सत्यवान नवले यांनी केली.