- आँखो देखा हाल
.
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा, दौंड, भोर
सातत्याने खंडित होणाऱ्या नेटवर्कमुळे ऑनलाइन व्यवहार होण्यात अडथळे, फास्टॅगशिवाय असणाऱ्या वाहनांची प्रचंड संख्या, तांत्रिक अडचणी आणि लेनचे विस्कळित नियोजन यामुळे फास्टॅगची सुविधा लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी टोल नाक्यावर गोंधळ उडाला होता. या यंत्रणेच्या अंमलबजावणीतील गोंधळामुळे टोल नाक्यांवरील काही लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. परिणामी वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
देशभरात विविध महामार्गांवरील टोल नाक्यावरील वाहनांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी तसेच वाहनांची वेगमर्यादा वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्व टोल नाक्यावर 'फास्टॅग'ची सुविधा रविवारपासून सुरू केली आहे. त्यानुसार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर ही यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी अंमलबजावणीत झालेल्या गोंधळामुळे टोल नाक्यांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या.
टोल नाक्यावर टोलवसुली करताना लागणारा वेळ कमी करण्यासाठी तीन मिनिटांत वाहने सोडणे बंधनकारक केले होते. असे न झाल्यास टोलमाफीची घोषणा सरकारने केली होती. मात्र, ही घोषणा हवेत विरली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व टोल नाक्यांवर वेगाने टोल वसुली व्हावी, यासाठी फास्टॅग यंत्रणा राबविण्याची घोषणा केली होती. ही यंत्रणा १ डिसेंबरपासून लागू होणार होती. मात्र, अनेक टोल नाके यासाठी सज्ज नसल्याने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील उर्से, खालापूर टोलनाक्यांसह पुणे जिल्ह्यातील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लोणावळ्याजवळील वरसोली, खेड शिवापूर, पाटस, राजगुरुनगर येथील टोल नाक्यावर ही यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप लेनचे नियोजन करण्यात आलेले नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अनेकांकडे फास्टॅग नसून, ही सुविधा कोठे उपलब्ध होते याबाबत माहिती नाही. टोल नाक्याच्या हद्दीतील स्थानिकांना या यंत्रणेतून सवलत मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
.
तांत्रिक अडचणींचा ब्रेक
ही यंत्रणा ऑनलाइन काम करते. मात्र, अनेक टोलनाक्यावर नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने वाहनांना काही वेळ एकाच ठिकाणी थांबावे लागत आहे. फास्टॅग यंत्रणा सक्तीची करून त्यानंतर १५ दिवसांची मुदत देऊनही अनेकांनी आपल्या गाड्यांना अद्याप फास्टॅग बसविलेले नाहीत. टोलनाक्यावर लेनच्या संख्येनुसार 'फास्टॅग'साठी व रोखीने टोल भरणा करणाऱ्यांसाठी लेन राखीव केल्या आहेत. 'फास्टॅग'च्या आणि रोखीने भरणा करण्यासाठीच्या टोल लेनबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था आहे. नेहमीच्या पद्धतीने अनेक जण कुठल्याही लेनमध्ये जात असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. फास्टॅग लेनमधून जाणाऱ्या वाहनांवर फास्टॅगची चिप असली तरी नेटवर्कअभावी टोलवसुलीला विलंब लागत होता. ही यंत्रणा वाहनचालकांच्या दृष्टीने सोयीची व सुलभ असली तरी सर्व टोलनाक्यांवर अत्यावश्यक पायाभूत सुविधांची गरज असल्याचे सोमवारी समोर आले.
.
पाटस गावाजवळ अंमलबजावणी नाही
दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस गावाजवळील टोल प्लाझावर सोमवारी 'फास्टॅग'ची अंमलबजावणी करण्यात आली नाही. सरकारने जाहीर केल्यानुसार १५ डिसेंबरपासून फास्टॅग प्रणाली लागू करण्यात येणार होती. मात्र, याबाबत स्पष्ट सूचना न मिळाल्याने फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यात आली नसल्याचे पाटस येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या टोल नाक्यावरून दररोज सुमारे सोळा हजार वाहने ये-जा करतात, तर शनिवार आणि रविवारी सुमारे २५ हजार वाहनांची ये-जा होते. २५ डिसेंबरनंतर या टोल नाक्यावर फास्टॅग प्रणाली सुरू होईल असा अंदाज आहे. फास्टॅग प्रणालीनुसार काम कसे होते, याची चाचणी प्रायोगिक तत्त्वावर पाटस टोल नाक्यावर घेण्यात आली. या वेळी रोख पैसे भरणा करण्यासाठीच्या लेनमध्ये वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
.
'फास्टॅग' लेन संथ
भोर : शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यानंतर सुरू झालेल्या 'फास्टॅग' सुविधेचा नेटवर्कमध्ये अडथळे असल्याने खेड शिवापूर टोल नाक्यावर बोजवारा उडाला.
शनिवार, रविवार आणि सरकारी सुट्यांच्या दिवशी या मार्गावर प्रचंड संख्येने वाहने येतात. 'फास्टॅग'च्या रांगेतून वाहन आल्यानंतर नेटवर्क सुरळीत नसल्यामुळे टोल देण्यासाठी किमान पाच मिनिटांचा वेळ लागत होता. या टोल नाक्यावर दहापैकी सात लेनमध्ये फास्टॅग सुविधा आहे.
.
स्थानिकांना भुर्दंड
टोल नाका परिसरातील स्थानिक नागरिकांना व वाहनचालकांना यापूर्वी या टोलमधून सवलत देण्यात आली आहे. फास्टॅग यंत्रणेमुळे ही सवलत बंद होणार आहे. त्यामुळे स्थानिक परिसरातील वाहनचालकांनी 'फास्टॅग'बद्दल संताप व्यक्त केला असून, या यंत्रणेत स्थानिकांना सवलत न दिल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.