म. टा. प्रतिनिधी, पुणे
'रंगमंचावरील चित्रपट' असे ज्या स्पर्धेचे वर्णन केले जाते, ती मानाची फिरोदिया करंडक स्पर्धा १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तरुणाईच्या अभिव्यक्तीला, नाट्यकला आणि ललित कलांसाठी रंगमंचाचे व्यासपीठ देणाऱ्या या स्पर्धेची अंतिम फेरी २४ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. संपूर्ण स्पर्धा सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे स्मारक सभागृहामध्ये दुपारी २ ते रात्री १० या वेळेत होणार असून रोज सहा संघांचे सादरीकरण होणार आहे.
'सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित व एचसीएल फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे हे ४७ वे वर्ष आहे. नाटक, संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला, अॅनिमेशन, पपेट शो आणि इतर कलाविष्कार एकाच वेळी रंगमंच्यावर सादर होणारी ही नावीन्यपूर्ण स्पर्धा आहे. यंदा ५० महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला असून, स्पर्धेची पूर्व प्राथमिक फेरी १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. पूर्व प्राथमिक फेरीमधून एकूण १० संघांची निवड करण्यात आली. मागील वर्षीच्या निकालानुसार २० संघ अशा एकूण ३० संघांना मुख्य फेरीमध्ये स्थान देण्यात आले आहे,' अशी माहिती संयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी दिली.
दरम्यान, हिंदू-मुसलमान, जम्मू-काश्मीर, कलम ३७०, भारत-पाकिस्तान, राम मंदिर-बाबरी मशिद याबाबतचे कुठलेही विषय; तसेच जाती-धर्मांबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय स्पर्धेत मांडण्यास बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाला प्रचंड विरोध झाल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला.
------------