Amit.Ruke@timesgroup.com
Tweet : @AmitRukeMT
पुणे : सहजीवनाची शपथ घेऊन अजून वर्षही झालेले नाही. त्यांच्या लग्नाला केवळ दहा महिने झाले आहेत. पण, दोघेही एकमेकांसोबतच्या सहजीवनापेक्षा समाजासोबतच्या सहजीवनासाठी झटत आहेत. प्रत्येकाचे आयुष्य निरोगी राहावे म्हणून 'करोना' विषाणूविरुद्ध त्यांची लढाई सुरू आहे. निरोगी समाजासोबतच्या सहजीवनासाठी योद्ध्यासारखे लढणाऱ्या या दाम्पत्याचे नाव आहे, डॉ. निखिल गोरे व डॉ. ऋतुजा चव्हाण-गोरे.
'करोना' विषाणूच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सर्वांत पुढे असलेले सैनिक म्हणजे डॉक्टर. पुण्यातील नायडू रुग्णालयात अनेक डॉक्टर कर्तव्य बजावत असून, गोरे दाम्पत्यही कोणतीही भीती न बाळगता एकमेकाला हिंमत देत धैर्याने लढा देत आहेत.
'करोना' विषाणूचा धोका लक्षात घेऊन सरकारने विविध ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नायडू रुग्णालयात नियुक्त केले आहे. मूळचे अंबाजोगाईचे पण बारामती उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे डॉ. निखिल गोरे व ऋतुजा चव्हाण-गोरे हे दाम्पत्य रुग्णांना बरे करण्याच्या मोहिमेत गुंतले आहे. १० मार्चपासून नायडू रुग्णालयात कार्यरत असलेल्या या दाम्पत्याकडे बाह्यरुग्ण विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे रुग्णालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी अथवा रुग्णाशी पहिला संपर्क त्यांचा येतो. रुग्णाची तपासणी करून 'करोना' चाचणीचा निर्णय घेणे, तसेच चाचणीसाठी आवश्यक नमुना (स्वॅब) घेण्याचे काम ते करतात.
'करोना'बाधित रुग्ण मानसिकदृष्ट्या खचलेला असतो. वैद्यकीय उपचारांसोबतच पूर्णपणे बरा होण्याचा विश्वास रुग्णाला द्यावा लागतो. अनेक रुग्ण सध्या खोकल्याला घाबरून रुग्णालयात येत असून, करोना तपासणीची मागणी करत आहेत. अशा वेळी त्यांची समजूत घालावी लागते,' असे गोरे दाम्पत्य सांगते.
अशा संकटावेळी स्वतःचा विचार न करता समाजासाठी आपली सेवा देण्याची निखिल यांची ही पहिलीच वेळ नाही. २०१४मध्ये जम्मू-काश्मीर येथील पूरग्रस्त भागात एका समाजसेवी संस्थेमार्फत नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांनी काम केले आहे. 'त्या वेळी तळागाळातील व अशिक्षित लोकांशी संपर्क आला होता. 'करोना'च्या साथीत आजवर तरी शिक्षित लोकांशी संपर्क आला आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी आपल्या आरोग्याविषयी एकीकडे अतिजागरूकता आणि दुसरीकडे गांभीर्य नसणारे, असे दोन्ही प्रकारचे लोक अनुभवायला मिळाले,' असे निखिल सांगतात.
निखिल यांची बहीण शिक्षणासाठी त्यांच्यासोबत पुण्यात वास्तव्यास असते. 'करोनाच्या रुग्णांशी संपर्क सुरू झाल्यापासून त्यांनी बहिणीला गावाकडे पाठवले आहे. आम्ही दोघे या सेवेत राहूच; मात्र यात आम्हाला संसर्ग झाल्यास आमच्या कुटुंबाला तो धोका नको म्हणून ही काळजी घेतली आहे. नायडू रुग्णालयात 'करोना'बाधित रुग्णांसाठी नियुक्ती झाल्याचे समजल्यावर वडिलांनी, 'हेच तर तुमचे खरे काम आहे,' म्हणत लढण्याची प्रेरणा दिली. आई मात्र काळजीत असते. रोज दिवसातून दोन वेळा फोन करते व काळजी घेताय ना, बरे आहात ना, अशी चौकशी करते,' असे निखिल सांगत होते.
...
आम्ही दहा मार्चला नायडू रुग्णालयात आलो तेव्हाच या संकटाचा शेवटपर्यंत सामना करण्याचा निर्धार केला. दोघांनाही दिवसाचे अनेक तास काम करण्याचा अनुभव आहे. या संकटात अविरत सेवा देत राहणार आहोत.
- डॉ. ऋतुजा चव्हाण-गोरे