म. टा. प्रतिनिधी, पुणे
तरुण वयात आयुष्यभर सामाजिक सेवा करण्याची स्वप्न बघणारे अनेक जण असतात. काहीजण तसे बोलूनही दाखवत असतात; पण मोजकेच लोक ते प्रत्यक्षात आणण्याचे धाडस दाखवू शकतात. अशा मोजक्या लोकांपैकी सुनीताताई गोडबोले या एक. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांची समाजसेवा सुरू आहे. मुख्यत: छत्तीसगड राज्यातील बस्तर परिसरातील दंतेवाडा जिल्ह्यात त्या काम करतात. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक आदिवासी महिलांना स्वावलंबी केले आहे; तसेच तेथील वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठीही त्या आणि त्यांचे पती परिश्रम घेत आहेत.
मूळच्या पुणेकर असणाऱ्या सुनीताताई या पूर्वाश्रमीच्या सुनीता पुराणिक. महाविद्यालयीन विद्यार्थीदशेत त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आल्या आणि सामाजिक कामाशी संलग्न होत गेल्या. त्यातूनच त्यांनी आयुष्यभर आदिवासी भागात प्रत्यक्ष राहून काम करण्याची दिशा निश्चित केली होती. 'एमएसडब्लू'चे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी काहीकाळ पुण्यातील एका सामाजिक संस्थेत अनुभवासाठी दोन वर्षे नोकरी केली. परंतु आदिवासी भागात काम करण्याचे स्वप्न काही त्यांना स्वस्थ बसू देईना.
गोडबोले यांनी १९८४ मध्ये रायगड जिल्ह्यातील जांभिवली केंद्रावर वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्ण वेळ काम करण्यास सुरुवात केली. आदिवासी महिलांमध्ये प्रत्यक्ष राहून त्यांच्यात मिसळून काम करण्याची संधी त्यांना त्यामुळे मिळाली. तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि आयुष्यभर आदिवासींसाठी काम करण्याचा निश्चय दृढ झाला. आदिवासी भागात प्रत्यक्ष राहून वैद्यकीय सेवा देण्याची स्वप्ने पाहणाऱ्या डॉ. राम गोडबोले यांच्याशी त्यांचे लग्न झाले. लगेचच या नवविवाहित दाम्पत्याने बस्तरमधे वनवासी कल्याण आश्रमाचे काम करण्याचा निर्णय घेतला.
दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर येथील आदिवासी मुलींच्या छात्रावासाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि डॉ. गोडबोले यांनी बारसूरमध्येच दवाखाना सुरू करून आदिवासींना वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. सुनीताताईंनी आदिवासींची स्थानिक 'गोंडी आणि हल्बी' भाषा शिकून घेतली. आदिवासी महिलांशी जवळीक वाढवून संघटन उभे केले. काही वनवासी महिला कार्यकर्त्या हिरीरीने कामाला त्यांच्यासोबत पुढे आल्या. सुनीताताईंना काही कारणांमुळे २००२ मध्ये महाराष्ट्रात यावे लागले. या काळात त्यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड परिसरात राहून किशोरवयीन मुलींचे आरोग्यशिक्षण आणि आदिवासी महिलांच्या संघटनाचे काम केले. दहा वर्षे काम केल्यावर पुन्हा बस्तरची ओढ निर्माण झाली. पुन्हा जोडपे बस्तरमध्ये दाखल झाले. आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनाबरोबरच सुनीताताई आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी पाड्यांवरील स्थानिक महिला आरोग्य सेविकांबरोबर काम करीत आहेत. बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी त्यांची आरोग्यविषयक प्रशिक्षणे घेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुण्यातील नामांकित संस्थांनी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवले आहे.
०००००००
'प्रत्यक्षात आपण मागास'
दुर्गम भागात राहणाऱ्या या आदिवासींचे प्रश्न सोडवायचे असतील तर, त्यांच्याबरोबर राहून काम करण्याची गरज आहे. आपण या समाजाला मागास म्हणतो; पण प्रत्यक्षात आपण मागास विचारांचे आहोत. त्यांची जीवनपद्धती, संकटांना सामोरे जाण्याची त्यांची तीव्र इच्छाशक्ती अनुकरणीय आहे. विकासाच्या नावाखाली आपण जगण्यातल्या चांगल्या गोष्टी हरवल्या आहेत. या मंडळींनी ते आजही जपले आहे. आम्ही आदिवासींबरोबर प्रामुख्याने त्यांच्या वैद्यकीय समस्या दूर करण्यासाठी तसेच त्यांना परंपरांशी निगडित व्यावहारिक ज्ञान देण्याचे काम करतो आहोत. या समाजातील अंधश्रद्धा कमी करून त्यांच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणाबद्दल जागृती करण्याची गरज आहे, अशी भावना सुनीताताई गोडबोले यांनी व्यक्त केली.
०००