अ‍ॅपशहर

पाचवी उत्तीर्णांनाच १७ क्रमांकाचा अर्ज

बहिःस्थ पद्धतीने दहावीची परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी पात्रतेची अट बदलण्यात आली आहे. ही परीक्षा देण्यासाठी चौथी पास ही सध्याची अट बदलून पाचवी पास अशी करण्यात आली आहे.

Maharashtra Times 26 Jul 2016, 5:03 am
बहिःस्थ दहावीच्या पात्रतेच्या अटीत बदल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम form no allowed to std five pass students
पाचवी उत्तीर्णांनाच १७ क्रमांकाचा अर्ज


म. टा. प्रतिनिधी, पुणे
बहिःस्थ पद्धतीने दहावीची परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी पात्रतेची अट बदलण्यात आली आहे. ही परीक्षा देण्यासाठी चौथी पास ही सध्याची अट बदलून पाचवी पास अशी करण्यात आली आहे.
या विषयीचा अधिकृत सरकारी निर्णय सोमवारी प्रसिद्धीस देण्यात आला. त्यानुसार, बाहेरून दहावीची परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी यापूर्वी पहिली ते चौथीचे शिक्षण पूर्ण करण्याची अट होती. चौथी उत्तीर्ण असलेले उमेदवार १७ नंबरच्या अर्जाच्या आधारे बाहेरून दहावीच्या परीक्षेसाठीचे अर्ज भरू शकत होते. मात्र, राज्यात आता शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यानुसार प्राथमिक शिक्षणामध्ये पहिली ते पाचवी आणि उच्च प्राथमिक शिक्षणामध्ये सहावी ते आठवीच्या वर्गांचा समावेश होतो. त्यामुळे १७ नंबरच्या अर्जासाठी पात्रता म्हणून प्राथमिक शिक्षणाचा विचार करताना, चौथीऐवजी पाचव्या इयत्तेचा विचार होणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून १७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी किमान पाचवी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरविले जातील.
पात्रतेच्या या नव्या निकषामुळे राज्यात शिक्षणहक्क कायदा लागू होण्यापूर्वी किंवा त्याहीपूर्वी चौथीनंतर शिक्षण सोडलेल्या आणि आता १७ नंबरच्या सुविधेच्या आधारे किमान दहावी उत्तीर्ण होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना पाचवीला प्रवेश घ्यावा लागणार आहे. या प्रकारामुळे शिक्षणाविषयी आस्था निर्माण होण्याऐवजी उमेदवारांमध्ये शिक्षणाविषयीची अनास्था वाढीस लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज