अ‍ॅपशहर

सहा महिन्यात विनयभंगाच्या चारशे घटना

राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढत होत आहे...

Maharashtra Times 22 Aug 2018, 4:00 am

मटा विशेष

----

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

............

@ShrikrishnaMT

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढत होत आहे. मोबाइल, सोशल मीडिया, कॉलेज परिसरात तरुणींचा पाठलाग करून त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांत पुण्यात तब्बल चारशे विनयभंगाचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये तरुणी व महिलांना त्रास देणारे, विनयभंग करणारे हे ओळखीतीलच सर्वाधिक असल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

शहरात दररोज एक ते दोन विनयभंग, छेडछाडीच्या घटना समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांना फोन करून त्रास देण्याइतपत आरोपींची मजल गेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नियंत्रण कक्षातील शंभर क्रमांकावर फोन करून महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याबरोबरच कॉलेज परिसरात टवाळखोर तरुणांकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थिनी पोलिसांकडे तक्रार देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, म्हणून पुणे पोलिसांनी खास महिला बीट मार्शलचा उपक्रम सुरू केला होता. तसेच, महिला पोलिसांचे 'दामिनी पथक'देखील आहे. पण, यांची रस्त्यावर कधीच उपस्थिती दिसत नाही. त्यामुळे ही पथके नेमके करतात तरी काय, असा प्रश्नदेखील नागरिकांना पडला आहे. या पथकाने कॉलेज परिसरात सकाळी व कॉलेज सुटण्याच्या वेळी गस्त घातली, तर या घटना टाळता येतील.

गेल्या सहा महिन्यांत पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल चारशे विनयभंगाचे प्रकार नोंदले गेले आहेत. तक्रार न देण्यासाठी आलेल्यांचा आकडा तर वेगळाच आहे. या नोंदणी झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी ३३७ आरोपींना अटक केली आहे. पुण्यात साधारण महिन्याला ६० ते ६५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत. अलिकडे सोशल मीडियावरूनदेखील महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहेत. महिला अत्याचाराचे गुन्हे रोखायचे असतील; तर महिलांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नवीन पोलिस आयुक्तांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

-------------

चोवीस तासांत आरोपपत्राचा विसर

महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांपैकी विनयभंगाच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल झाल्यापासून चोवीस तासांत तपास पूर्ण करून कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना पूर्वीच्या पोलिस महासंचालकांनी दिल्या होत्या. विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी, हा त्यामागील हेतू होता. बऱ्याच वेळा विनयभंगाची तक्रार देणाऱ्या पीडित तरुणी नंतर कोर्टात केसमध्ये साक्ष देण्यासाठी येत नाहीत. त्यांचा विवाह झालेला असतो या कारणामुळे किंवा नंतर बदनामीच्या भीतीमुळे तरुणी कोर्टात फिरकत नाहीत. त्यामुळे चोवीस तासांत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. काही दिवस हा आदेश पाळला गेला; पण नंतर याकडे दुर्लक्ष झाले.

-------------------

गेल्या सहा महिन्यांतील विनयभंगाची आकडेवाडी

महिना विनयभंगाच्या घटना अटक आरोपी

जानेवारी ६४ ५६

फेब्रुवारी ६२ ५८

मार्च ७१ ६४

एप्रिल ६९ ५०

मे ८० ५४

जून ५४ ५५

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज